दिल्ली l Delhi
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे.
या सामन्यातील आजचा (८ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. या दिवशी भारताचा पहिला डाव ९५.५ षटकांत ३३७ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताला २४१ धावांनी पिछाडी स्विकारावी लागली आहे.
पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने ५७८ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली, पण ऋषभ पंत- चेतेश्वर पुजारा जोडीने डाव सावरला. त्यांच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर-अश्विन जोडीनेही डावाला स्थैर्य दिले. चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावातील ७५ व्या षटकापासून आणि ६ बाद २५७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. भारताकडून तिसऱ्या दिवशी नाबाद असलेली वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विनची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. या दोघांनी दिवसाच्या सुरुवातीला चांगला खेळ केला.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने काही शानदार शॉट मारत चौकार वसुल केले. याबरोबरच ८० व्या षटकात जॅक लीचला चौकार ठोकत त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे. त्याने हे अर्धशतक ८२ चेंडूत पूर्ण केले. याबरोबरच सुंदर आणि अश्विन यांच्या अर्धशतकी भागीदारीही पूर्ण झाली. अश्विन बाद झाल्यानंतर काहीवेळातच शहाबाज नदीम देखील लगेचच बाद झाला. त्याला जॅक लीचने शुन्य धावेवर बाद केले. त्यापाठोपाठ जेम्स अँडरसनने इशांत शर्माला ९४ व्या षटकात ४ धावांवर बाद करत भारताला ९ वा धक्का दिला. अखेर ९६ व्या षटकात अँडरसनने जसप्रीत बुमराहला शुन्यावप बाद करत भारताचा डाव ३३७ धावांवर संपवला.