दिल्ली | Delhi
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने गोलंदाजीत धमाकेदार कामगिरी केली.
मिचेल स्टार्कने चेंडूचा वेगवान मारा करून भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांपुढं भारताच्या फलंदाजांची दाणादाण उडाली अन् भारताचा आख्खा संघ २६ षटकांत ११७ धावांवर गारद झाला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. ७ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने सर्वाधिक २९ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो संघाच्या गोलंदाजांनी अगदी योग्य असल्याचे सिद्ध झाला. मिचेल स्टार्कने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. दुसरीकडे, सीन अॅबॉटने ३ आणि नॅथन एलिसने २ बळी घेतले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे गुडघे टेकले होते.