औरंगाबाद – Aurangabad
हॉटेल आणि रेस्टॉरंटवर संपूर्ण लॉकडाऊन लावल्यावर राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमधील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक मोठ्या संकटात सापडले आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंटचे म्हणणे आहे की, आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पुन्हा अशाप्रकारची घोषणा केल्यामुळे व्यवसाय मृत्यूपंथाला टेकेल. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) आणि औरंगाबाद हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने इशारा दिला आहे.
याघडीला पूर्ण लॉकडाऊन केल्यामुळे आदरातिथ्य उद्योगाचे भरुन न येणारे नुकसान होईल. हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून जाण्यापासून रोखायचा असेल तर सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि रेस्टॉरंट्सला नियमित वेळेप्रमाणे व्यवहार करु द्यावेत आणि गरज असेल तर त्यातील संख्येवर निर्बंध आणावेत अशी विनंती एचआरएडब्ल्यूआयने केली आहे. संघटनेने याकडेही लक्ष वेधले आहे की, पूर्ण लॉकडाऊनमुळे शहरातील जवळजवळ 500 हॉटेल आणि 1300 रेस्टॉरंट व बारमध्ये काम करणारे लोक मोठ्याप्रमाणात बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे पूर्ण यंत्रणा दिवाळखोरीकडे ढकलली जाईल.
लॉकडाऊन उठवल्यानंतरही 30 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट अजून खुली झालेली नाहीत; आर्थिक संकटामुळे 20 टक्के तर पूर्णपणे बंद झालेली असून उघडलेली उर्वरित 50 टक्के या निर्बंधांमुळे पुन्हा बंद झाली आहेत. कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे हे नाकारता येणार नाही मात्र त्यासाठी केवळ आदरातिथ्य उद्योगाला जबाबदार धरणे हे पूर्णपणे अयोग्य आहेत. किंबहुना हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सर्वप्रकारच्या खबरदारी पूर्णपणे घेतल्या जातात. या साथीच्या रोगाच्या कालावधीत गंभीर परिस्थितीत आदरातिथ्य उद्योग आघाडीवर येऊन लढा देत होता. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या उद्योगाने निवारा दिला आणि दररोज लाखो गरजूंना अन्नही पुरविण्यात आले. आम्ही सरकारला विश्वास देऊ इच्छितो की, आम्ही एक जबाबदार उद्योग आहोत आणि त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंटला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनी सांगितले.
औरंगाबादमधील रेस्टॉरंटवर पूर्ण लॉकडाऊन जाहीर केल्यावर रेस्टॉरंट चालकांनी सांगितले आहे की, जिल्हा प्रशासनाने केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला लक्ष्य केले असून अतिशय कठोर निर्णय घेतला आहे.
जवळपास हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारला जबाबदार धरण्याचा हा प्रकार आहे. सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे आम्ही पालन करत आहोत. हॉटेल आणि रेस्टॉरंटचा परिसर नियंत्रित असून सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरीदेखील हॉटेल आणि रेस्टॉरंट कारवाईच्या विळख्यात आले आहेत. अशाप्रकारच्या निर्णयाचा उद्योगावर आणि त्यात काम करणाऱ्या लोकांवर होणाऱ्या परिणामाचा प्रशासनाने विचार करावा अशी विनंती मी करतो आणि तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा अशी माझी विनंती आहे, असे औरंगाबाद हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे प्रवक्ते हरप्रीत सिंग यांनी सांगितले आहे.