सप्तशृंगगड | Saptsrungigad
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगडावरील देवी मंदिर बंद असल्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे.
येथील अर्थव्यवस्था देवी मंदिरावर अवलंबून असून येथील ग्रामस्थांची व व्यावसायिकांचे अर्थचक्र ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्यांची व व्यावसायिकांची चिंता वाढत असताना ‘ एकमेका साहाय्य करुन अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे ग्रामस्थांच्या मदतीसाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहे.
राज्यात पुन्हा दि. 1 जून ते 15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढविल्याचे शासनाने स्पष्ट केल्याने धार्मिक स्थळे अजून किती दिवस बंद ठेवणार असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे. गडावरील ग्रामस्थ 65 टक्के आदिवासी बांधव व 20 टक्के हातावर काम करणारे व उर्वरीत व्यावसायिक असून गत वर्षापासून व यावर्षीही करोनाचा सामना करत धार्मिक स्थळे बंद आहे. त्यामुळे येथील अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले आहे.
सप्तशृंगगडावरील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर कदम, दीपक जोरवर, राजेश गवळी यांच्या पुढाकाराने गजानन महाराज शेगाव, गोरेगाव, मुंबई मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. स्वरुप प्रामाणिक, भाग्यश्री प्रामाणिक यांच्यातर्फे येथील गरजू आदिवासी कुटूंबाना मदतीचा हात म्हणून तांदुळ, तुरडाळ, चहा पावडर, साखर, गव्हाचे पीठ आदी जीवनोउपयोगी वस्तू, किराणा जाहित्याचे जॅम्बो 300 किटचे वाटप करण्यात आले.
तसेच कल्याण – डोबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे वडील नामदेवराव सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी यांच्या मदतीने मी कल्याणकर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने नितीन निकम यांच्यामार्फत येथील गरजू लोकांसाठी 500 किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. अशोक चव्हाण, अजय ठुबे यांनीही सुध्दा मदतीचा हात पुढे केला आहे.