औरंगाबाद – Aurangabad
कोविड 19 (Covid 19) विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी कोविड चाचण्या अधिकाधिक करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, आरोग्य यंत्रणेसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सुपर स्प्रेडर दुकानदार, हॉटेल चालक, विविध आस्थापनांच्या कर्मचारी, कामगारांची कोविड चाचणी करून घ्यावी. त्याचबरोबर चाचण्यांसह लसीकरण करण्यावरही भर देण्यात यावा. मागील आठवडयात शहरी भागात पाच हजार 445 आणि ग्रामीण भागात 10 हजार 865 नागरिकांना प्रती दिवसाला लस देण्यात आली. जिल्ह्याचा पॉजिटिव्हिटी दर 0.89 टक्के असून तो कमी करण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.