अहमदनगर | प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे युवकांना मारहाण प्रकरणी दोघांना एलसीबीने अटक केली आहे. युवराज नानासाहेब गलांडे (वय ३६) व मनोज वसंत बोडखे असे त्यांची नाव असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने ही कारवाई केली.
दरम्यान गुरुवारी घडलेली या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. या घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यावे, अन्यथा मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय श्रीरामपूर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील हरेगाव येथील कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे यांना हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती. सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ काल हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यातील आरोपींना दोन दिवसात अटक करुन त्यांच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सुमारे तासभर चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे नेवासा रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. वाहनांच्या मोठ्या रांगा तयार झाल्या होत्या.