अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज (गुरुवारी) जिल्हा दौर्यावर येत आहेत.
यावेळी त्यांच्याहस्ते करोनामुळे मृत झालेल्या जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कुटुंबियांना विमा कवच 50 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे. साधारण सव्वा महिन्यांनंतर पालकमंत्री जिल्ह्यात येत असून ते बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
पालकमंत्री मुश्रीफ यांचे सकाळी शिर्डी येथे आगमन होणार असून त्यानंतर श्रीसाईबाबा दर्शन. त्यानंतर नगरला जिल्हाधिकारी कार्यालय करोनामुळे मयत झालेल्या ग्रामसेवक कुटुंबियांना विमा कवच अंतर्गत मदत रुपये 50 लाख रकमेचा धनादेश वाटप कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर करोनाची विद्यमान स्थिती आणि दुसरी लाट याबाबत आढावा बैठक, तद्नंतर अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना देण्यात येणार्या शासकीय मदतीबाबत आढावा बैठक होणार आहे.
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात विविध प्रकरणे गाजली आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील बिबट्याची दहशत, नगरमधील बनावट डिझेल प्रकरण आदींचा समावेश आहे. त्यातच सोमवारी नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. आता यासर्व प्रकरणावर पालकमंत्री मुश्रीफ काय भूमिका मांडणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.