द्राक्ष निर्यातीने शेतकऱ्यांंना दिलासा

jalgaon-digital
2 Min Read

लासलगाव। वार्ताहर

संपूर्ण देशभरात संचारबंदी सारखी परिस्थिती असतांना द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातून करोनाच्या दुसर्‍या लाटेतही उगाव येथील द्राक्ष व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांनी 40 ते 45 लाख रूपयांची दीडशे टन द्राक्षांची रेल्वेद्वारे बांगलादेशात निर्यात केली आहे. दक्षिण रेल्वेचे शेवटचे स्टेशन असलेल्या नगरसूल रेल्वे स्थानकातून विशेष किसान रेल्वेने ही द्राक्ष निर्यात झाली आहे.

सध्या संपूर्ण जिल्हाभरात 80 ते 100 रु. किलोच्या निर्यातक्षम द्राक्षांना 25 ते 30 रु. किलोचा भाव मिळत आहे. मागील वर्षीही लॉकडाऊन काळात 5 ते 10 रुपयांचा दर द्राक्षाला मिळाला होता. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील उगाव येथील द्राक्ष निर्यातदार व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांनी 40 ते 45 लाख रुपयांचे दीडशे टन द्राक्ष अनेक अडचणींवर मात करत बांगलादेशातील ढाका येथे पाठवून या द्राक्ष निर्यातदार व्यापार्‍याने करोना संसर्गादरम्यान दमदार कामगिरी करत द्राक्षे उत्पादक शेतकर्‍यांना नवसंजीवनी दिली आहे.

निफाड आणि लासलगाव या दोन रेल्वेस्थानकांवर मध्य रेल्वे जवळ पाठपुरावा करून सुद्धा विशेष किसान रेल उपलब्ध न झाल्याने दक्षिण रेल्वेकडे द्राक्ष बांगलादेशातील ढाका येथे पाठवण्यासाठी बांगलादेश बॉर्डर पर्यंत विशेष किसान रेल्वेची मागणी करताच उपलब्ध झाल्याने प्रथमच दक्षिण रेल्वेचे शेवटचे असलेले येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वे स्थानकावरून दीडशे टन द्राक्षे पाठवण्यात आले. जर निफाड किंवा लासलगाव रेल्वे स्थानकावर ही विशेष किसान रेल्वे उपलब्ध झाली असती तर यामागेही शेतकर्‍यांना 15 ते 20 हजार रुपयांचा नगरसूल पर्यंतचा वाहतूक खर्च वाचला असता. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत पुढील काळात द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी लासलगाव किंवा निफाड रेल्वे स्थानकात वातानुकूलित विशेष किसान रेल्वे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी द्राक्ष निर्यातदार नामदेव पानगव्हाणे यांनी केली आहे.

रेल्वेने द्राक्ष निर्यातीसाठी कमी कालावधी

ट्रकने द्राक्ष बांगलादेशात पाठवण्यास अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. मात्र हीच द्राक्ष रेल्वेने पाठवल्यास अवघा दीड लाख रु. खर्च येतो. तसेच रेल्वेने बांगलादेश सीमेपर्यंत द्राक्षमाल पोहचवण्यासाठी अवघे 30 तास लागतात तर ट्रकला 50 तासांहून अधिक काळ लागतो. निफाड तालुक्यात द्राक्षपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने लासलगाव किंवा निफाड रेल्वे स्थानकातून वातानुकूलित विशेष किसान रेल्वे उपलब्ध उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे.

नामदेव पानगव्हाणे (द्राक्ष निर्यातदार)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *