दिल्ली | Delhi
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज त्यांच्या जम्मू येथील रॅलीमध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. मात्र, नवीन पक्षाचे नाव आणि झेंडा हे काश्मीरचे लोकं ठरवतील असेही आझाद यांनी म्हटलं आहे.
तसेच गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या अजेंड्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर नव्हे तर गव्हर्नर असेल. लोकांना त्याच्या जमिनी मिळाव्यात. जम्मू-काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळावा. बिहारमधील कुणालाही जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी मिळू नये. तसेच काश्मिरी पंडितांचं काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन व्हावं हा माझा अजेंडा आहे, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.
यावेळी त्यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला आहे. आम्ही आमच्या रक्त आणि घामानं काँग्रेसची स्थापना केली आहे. काँग्रेस ही संगणकाने नाही, ट्विटरने नाही, संदेशांने नाही तर आमच्या घामानं स्थापन केली आहे. आमची बदनामी करणार्यांचीच पोहोच ही फक्त ट्विटर आणि संगणकावर असल्याचा टोला आझाद यांनी यावेळी लगावला.