मुंबई | Mumbai
गेल्या दोन वर्षांपासून बाप्पाच्या भेटीची आस लागलेल्या गणेश भक्तांची आज काळजी मिटली. तब्बल दोन वर्षानंतर भाविकांनी विघ्नहर्त्या गणरायाचं (Ganesh Chaturthi) जल्लोषात स्वागत केलं. ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं आगमन झालं.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करुयात आणि पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करुयात, सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
गणपतीच्या आशीर्वादानं करोनाचं संकट दूर झालं आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव आपण करत आहोत. गणरायाचं स्वागत करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करुयात. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं.