Saturday, April 27, 2024
Homeनगरगणेश गाळप यशस्वी करेल - खा. डॉ. विखे

गणेश गाळप यशस्वी करेल – खा. डॉ. विखे

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गणेश कारखाना तीन ते साडेतीन हजार मेट्रीक टन दैनंदिन गाळप करावे, म्हणून त्याचे आधुनिकीकरण केले. मागील वर्षी ज्या अडचणी आल्या त्या यावर्षी दूर करु शकलो. विखे कारखाना, राहुरी आणि गणेश या तीनही कारखान्यात गणेश सर्वात पहिला सुरु होईल व गणेश गाळप यशस्वी करेल, असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या ऑनलाईन पध्दतीने झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खा. डॉ. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ हे होते. उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, तसेच संचालक मंडळातील सदस्य, कार्यकारी संचालक अभिजीत भागडे अदि उपस्थित होते. ऑनलाईन पध्दतीने अण्णासाहेब म्हस्के हे ही उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय या सभेत मंजुर करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना खा. डॉ. सुजय विखे पा. म्हणाले, प्रवरा, राहुरी व गणेश हे तीनही कारखाने संकटात होते, अडचणीत होते. महाराष्ट्रात दूसरे कुणीही असते, किती ही मोठा नेता असता, तर तो कारखाना सोडून पळुन गेला असता. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचेच कौशल्य आहे, एवढ्या संकटात जावुनही आपण गाळप हंगाम यशस्वी केला. त्यांना कारखाना परिसरातील सभासद शेतकर्‍यांची साथ ही लाभली. हा कौटूंबिक जिव्हाळा कै. पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पासुन प्रवरा आणि गणेश परिसरात स्थापित करु शकलो.

ही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी उपलब्धी आहे. गणेश कारखाना आपण खाजगी म्हणून न घेता तो सभासदांच्या मालकीचाच राहावा म्हणून सहकारी तत्वावर चालविण्यास घेतला. सहकारी आणि खाजगी कारखान्यांची तुलनाही यावेळी खा. डॉ. विखे पा. यांनी मांडली. सुरुवातीला आपण गणेश मोठ्या ताकदीने चालविला. पैसे गुंतविले, सभासदांचा विश्वास संपादन केला. प्रवरेला करार वाढवून देवु नये म्हणुन तक्रार झाली. लोक कोर्टात गेले. आता ही बाब न्याय प्रविष्ठ आहे.

आपल्या तालुक्याच्या भोवताली राजकिय त्रिकोन असल्याचा उल्लेख करत खासदार डॉ. विखे म्हणाले, एका बाजुने सल्ला, दुसर्‍या बाजुने पैसा, आणि तिसर्‍या बाजुने याचिका असा धंदा सुरु असल्याचे ते म्हणाले. या संचालक मंडळाने 6 वर्ष चांगले काम केले. सहकार्य केले. गणेशचे सभासद पुढेही कारखाना आपल्या ताब्यात ठेवतील, असा विश्वसासही खा. डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

प्रास्तविकात गणेश चे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ म्हणाले, यंदा धरणे भरल्याने आमदार विखे पाटील व खासदार विखे पाटील यांच्यामुळे कालव्यांना पाणी मिळेल. सभासदांना उस लागवडी करुन गणेशला उस द्यावा, आमदार विखे पाटील यांनी निळवंडे च्या संदर्भात अकोल्यातील कालव्याच्या अडचणी सोडविल्या असल्याने पाणी या भागात येईल. यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक अ‍ॅड. रघुनाथ बोठे यांचेही भाषणे झाली.

आमदार विखे पाटील यांच्यामुळेच कालव्यांचे काम मार्गी !

निळवंडेचे कालव्यांचे अकोले तालुक्यातील काम अपुर्ण होते. मधुकरराव पिचड यांना विश्वासात घेवुन आमदार विखे पाटील यांनी कालवे त्या भागात होण्यासाठी प्रयत्न केला. ते काम होईल. शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा. असे माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यावेळी म्हणाले.

याप्रसंगी संचालक अशोकराव दंडवते, मधुकर कोते, राम कोते, अ‍ॅड. शिवराम गाडेकर, सुदाम सरोदे, बाळासाहेब दाभाडे, नलिनीताई डांगे, विलास डांगे, विजय गोर्डे, जे. आर. चोळके, सुर्यकांत निर्मळ, जालिंदर निर्मळ, भाउसाहेब शेळके, आण्णासाहेब सदाफळ, नितीन गाढवे, राजेंद्र थोरात, विशाल चव्हाण, उद्योजक जयराज दंडवते, तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या