राजुरी |वार्ताहर| Rajuri
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच ढगाळ हवामान व धुके पडल्यामुळे पिकांवर रोगराईच्या प्रमाणात वाढ झालेली सध्यातरी दिसू लागली आहे.
2022 नवीन वर्षाची सुरुवात ही पहिल्या दिवसापासून धुक्याने झाली होती. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून तिसर्यांदा मोठ्या प्रमाणात धुके पडल्यामुळे शेतामधील हरभरा, गहू, कांदे इतर पालेभाज्या व जनावरांसाठी उपयुक्त असणार्या घासाच्या पिकावर या पडलेल्या ढगाळ हवामानामुळे व धुक्यामुळे मावा पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये फवारणी करताना धावपळी होत आहेत.
करोना या महामारीतून बळीराजा कसाबसा बाहेर निघत असताना अशा एक ना अनेक संकटांना सध्या शेतकरी वर्ग सामोरा जात आहे. द्राक्ष, डाळिंब यासारख्या पिकांवरही मोठ्या प्रमाणात फळांवर डाग व टिपके सध्या दिसून येत आहेत. याचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्वच घटकांना बसत आहे. खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी काहीशी अवस्था सध्या शेतकर्यांवर सध्या आलेली पहावयास मिळत आहे.