Thursday, April 25, 2024
Homeनगरवाहत्या पाण्यात मोटारसायकल घातली, पित्यासह दोन मुले गेली वाहून

वाहत्या पाण्यात मोटारसायकल घातली, पित्यासह दोन मुले गेली वाहून

बोधेगाव|वार्ताहर|Bodhegav

बालमटाकळी येथील घोरपडे कुटुंबातील तिघेजण गेवराई तालुक्यामध्ये पाहुण्याकडे जात असताना रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नद्यांना पाणी आलेले होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान घोरपडे हे मोटारसायकलवर जाताना अमृता नदीच्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून मोटारसायकल घातली.यात त्याच्यासह त्याच्या सोबत असलेले त्याचे दोन्ही मुले वाहून गेले. यातील मुलीचा मृतदेह आज सकाळी सापडला तर अन्य दोन मृतदेहांचा शोध नदीच्या कडेने प्रशासनासह नातेवाईक घेत आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बालमटाकळी येथील कृष्णा घोरपडे (वय ३५) हे आपला मुलगा (वय ८), मुलगी (वय ५) हे दुचाकीवरून पाहुण्याकडे जात असताना गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी जवळ आल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जोरदार पाऊस सुरू झाला या पावसामुळे अमृता नदीला मोठा पुर आला. पुलावरून पावसाचे पाणी ओसंडून वाहू लागलेले असताना घोरपडे यांनी वाहत्या पाण्यात मोटारसायकल घातली. पाण्याचा अंदाज न आल्याने यावेळी ते मोटारसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. रात्र असल्याने याची कल्पना कुणालाच नव्हती.

दरम्यान खळेगाव येथील तीन युवकांनी याच पुलावरून गाडी घातली, त्यांचीही गाडी स्लिप होऊन ते नदीत पडले. मात्र तिघांनाही पोहता येत असल्याने ते गाडी सोडून किनार्‍यावर आले व घरी जाऊन आज शुक्रवारी सकाळी ते परत आपली गाडी शोधण्यासाठी नदीत उतरले असता त्यांना त्यांची गाडी न सापडता दुसरीच गाडी सापडली. यावरून अन्य कोणी तरी या नदीत पडले असल्याची त्यांना शंका आली.

याच दरम्यान घोरपडे यांचे नातेवाईक अमृता नदीच्या पुलाजवळ आले, कारण रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या घरच्यांना फोन करून सांगितले होते की, मी पौळाचीवाडी जवळ आहे, आता खूप पाऊस पडतोय, असे म्हणून फोन ठेवला होता. त्यानंतर त्यांचा फोन लागलाच नाही. त्यामुळे नातेवाईक त्यांच्या शोधार्थ अमृता नदीच्या पुलाजवळ आले होते. त्यांचा शोधाशोध घेतल्यानंतर ५ वर्षीय मुलीचा मृतदेह दुपारी सापडला. मात्र कृष्णा घोरपडे आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह प्रशासनासह घोरपडे यांचे नातेवाईक शोध घेत आहेत. घटनेची माहिती होताच नातेवाईक पोलीस महसूल प्रशासन व ग्रामस्थांनी मोठी गर्दी झाली होती.

या दुर्दैवी घटनेने बालमटाकळी सह गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चकलंबा पोलिस ठाण्याचे सपोनि. विजयकुमार देशमुख, पीएसआय पवार, पीएसआय झिंझुर्डे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी धाव घेतली. बापलेकाचा शोध घेत आहेत मात्र रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या