नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर आता शहर वासियांना बाजारपेठेत जाण्यासाठी कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे. आता बाजारपेठेत जाण्यासाठी प्रति तास पाच रुपये प्रतिव्यक्ती आकारले जाणार असून एक तासापेक्षा अधिक काळ जर बाजारसमितीमध्ये टाईमपास केला तर पाचशे रुपयांचा दंड महापालिका वसूल करणार आहे…
शहरात करोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे.वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकायला सुरुवात केली असून या कारवाईचा एक भाग म्हणून आता बाजारपेठेत सशुल्क प्रवेश मिळणार आहे.
पालकमंत्र्यांनी नाशिककरांना ८ दिवसांचा अल्टीमेटम देत करोना कमी करण्यासाठीचे आवाहन केले होते. मात्र, मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या नाशकात दिसून येत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शक्कल लढवली असून पाच रुपये प्रती व्यक्ती एक तासांसाठी बाजारात प्रवेश दिला जाणर आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार असून ठिकठिकाणी पोलीस देखील नागरिकांना नियम पाळण्यासाठी शासन करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील शालिमार, नवापुरा, बादशाही कॉर्नर येथे पोलिसांची बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. प्रत्येक पॉइंटवर टेंट असणार असल्याचे समजते.
बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडून पास दिले जाणार आहेत. पासधारकांनाच याठिकाणी प्रवेश असणार आहे.
मेनरोड, सिटी सेंटर मॉल, पंचवटी बाजार समितीमध्ये हा निर्णय लागू असणार आहे. त्यामुळे कठोर नियम नागरिकांना पाळावेच लागणार आहेत.
या कारवाईसाठी सकाळी ८ ते रात्री ८ पोलीस तैनात असणार आहेत तसेच रात्री ८ नंतर कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेने दिली आहे.