सातपूर । Satpur (प्रतिनिधी)
निमातील सत्तासंंघर्ष उच्च न्यायालयात गेल्याने आज (दि.15) न्यायालय देणार असलेल्या निर्णयाकडे उद्योगक्षेत्राचे डोळे लागलेले आहेत. निमातील सत्ता, निमात वापरली जाणारी घटना अधिकृत की अनधिकृत, निवडणूक समितीचे कायदेशीर की बेकायदेशीर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहेत.
त्यामुळे येणार्या काळात शह काटशहच्या राजकीय घडामोडींना निश्चितच ऊत येईल असे चित्र आहे. कोविडमुळे निवडणुका न झाल्याने विद्यमान पदाधिकार्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह या पदाधिकार्यांनी धरला होता.
निमाच्या नियमानुसार विश्वस्त मंडळाला तो अधिकार असल्याने विश्वस्त मंडळाने नवीन पदाधिकार्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे कार्यभार देण्यात सुचित करण्यात आले.
मात्र विद्यमान पदाधिकारी व विश्वस्त मंडळ नियुक्त पदाधिकारी यांच्यात संघर्ष वाढू लागला. निमातील सेवक पॉझिटिव्ह असल्याचे सांगून, 14 दिवसासाठी निमा कार्यालय सेल्फ क्वारंटाईन करण्यात आले होते.
तसेच विद्यमान पदाधिकार्यांनी धर्मदाय आयुक्तांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तर विश्वस्त नियुक्त अध्यक्ष विवेक गोगटे व त्यांच्या टीमने उच्च न्यायालयात धर्मदाय आयुक्तांसह विद्यमान पदाधिकार्यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती.
या प्रकरणात धर्मदाय आयुक्तच पार्टी असल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.