औरंगाबाद – aurangabad
इंडिगो कंपनीने (Indigo Company) सकाळच्या सत्रात मुंबईसाठी (mumbai) विमानसेवा (Airlines) काही दिवसांपूर्वी सुरू केली असून ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद यांनी इंडिगो कंपनीच्या व्यवस्थापनाकडे सायंकाळच्या सत्रात मुंबईसाठी विमान सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर अखेर इंडिगो विमान कंपनीने एक डिसेंबरपासून औरंगाबाद विमानतळावरून सायंकाळच्या सत्रात विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली.
औरंगाबादवरून सकाळच्या सत्रात टाटा एअर इंडिया कंपनीने मुंबई आणि दिल्लीसाठी दोन विमाने सुरू केली. या विमानांना चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर इंडिगो विमान कंपनीनेही सकाळच्या सत्रात विमाने सुरू करण्याचे नियोजन केले. या नियोजनानुसार सकाळच्या सत्रात मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. औरंगाबाद विमानतळावरून इंडिगो विमान कंपनीच्या मुंबई आणि दिल्लीसाठी प्रत्येकी एक आणि हैदराबादसाठी दोन फेऱ्या सुरू केलेल्या आहेत. सायंकाळच्या सत्रात मुंबईसाठी विमान असावे, अशी मागणी अनेकांनी केली होती. यापूर्वी जेट एअरवेजचे मुंबईसाठी सायंकाळी विमान होते. जेट एअरवेजला चांगले प्रवासी मिळत होते.
आगामी एक डिसेंबरपासून औरंगाबाद विमानतळावरून मुंबईसाठी दुसरे विमान सुरू होणार आहे. ६ ई ५३९२ हे विमान मुंबईहून ५.४० वाजता उड्डाण करणार आहे. हे विमान औरंगाबाद सहा वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर, ६ ई ५३८३ हे विमान औरंगाबादहून सायंकाळी सात वाजून १० मिनिटांनी मुंबईकडे निघणार आहे. मुंबईला हे विमान रात्री ८.१० वाजता पोहोचणार आहे.