राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
आयएएस प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळात काढलेल्या राहाता बाजारतळावरील अतिक्रमणातील टपर्या पालिकेचे
अधिकारी व पदाधिकारी यांनी पुन्हा लावल्याने या विरोधात नगरसेविका निलम सोळंकी यांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित अतिक्रमणे काढून मदत करणार्या अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले की, तत्कालीन मुख्याधिकारी असीमा मित्तल यांच्या कार्यकाळात नगरपालीकेसमोरील बाजारतळालगतच्या पालिकेच्या जागेवर टपर्या टाकून तेथे मटका व इतर अवैद्य व्यवसाय सुरू होता. नागरिकांच्या तक्रारीवरून संबंधित पत्र्याचे गाळे स्वतः त्यांनी काढून टाकले होते.
मात्र सदर जागेवर पालिकेच्या काही अधिकारी व पदाधिकारी यांनी संगनमत करून सदर जागेवर पुन्हा दुकानी उभ्या केल्या असून याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे डोळेझाक केली जात असून पालिकेसमोर हे अतिक्रमण सुरू असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आपन तातडीने याप्रश्नी लक्ष घालून संबंधित अतिक्रमण हटवावे व याला जबाबदार असनार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
यावर निलम दिपक सोळंकी, शारदा बाळासाहेब गिधाड, अनिता अभिजीत काळे, निवृत्ती रेवजी गाडेकर, सचिन विठ्ठल गाडेकर या पाच नगरसेवकांच्या सह्या आहेत.