Thursday, April 25, 2024
Homeनगरएल्गार आंदोलनात सहभागी व्हा : आ. विखे

एल्गार आंदोलनात सहभागी व्हा : आ. विखे

राहाता|प्रतिनिधी|Rahata

राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या दिवसागणीक वाढत चालल्या आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय शेतकर्‍यांना आधार ठरला असतानाच या व्यवसायाकडेच महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करुन आ. विखे पाटील म्हणाले की, करोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत.

राज्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांच्याही आत्महत्या सुरु झाल्या पण त्याच्याही संवेदना या सरकारला राहिलेल्या नाहीत. करोना संकटात दूध उत्पादक शेतकर्‍यांना 25 रुपये हमीभाव देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही, महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारमधील मंत्र्यांच्या दूध संघांनीच उत्पादकांना कमी दरात दूध खरेदी करण्याची भूमिका घेवून एकप्रकारे उत्पादकांवर अन्याय केला आहे. शासनाच्या या निष्क्रीयतेचा निषेध म्हणून राहाता येथे सकाळी 10 वा. भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी, दूध संकलन केंद्रचालकांच्या उपस्थितीत हे आंदोलन नगर मनमाड रोडवर स्टेट बॅकेसमोरील विरभद्र दूध उत्पादक संस्थेजवळ करुन दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात येणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने 20 जुलै रोजी राज्यभर आंदोलन करुन दुधाला प्रतिलिटर 30 रुपये भाव द्यावा, दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 10 रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, अशा मागण्याचे निवेदन दिले होते. या मागण्यांबाबत सरकारने कोणताच निर्णय केला नाही. यामुळेच 1 ऑगस्ट 2020 रोजी राज्यभर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या