श्रीरामपूर (प्रतिनिधी) –
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस प्रशासनाने टाकलेल्या गुटखा जप्ती छाप्यातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात गुटखा विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादन यावर अन्नसुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांच्या 15 जुलै 2014 च्या अधिसुचनेद्वारे प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे देशातही तंबाखू मिश्रीत गुटखा विक्रीस बंदी आहे. मात्र, अशाही परिस्थितीत चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री, साठा, वाहतूक, वितरण सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव
मंगळवारी सकाळी एकलहरेतील आठवाडीत समोर आले. परिसरातील गुलाबाच्या बागेलगद असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बेलापूरचा सलमान तांबोळी, राहाता तालुक्यातील निमगाव परिसरातील साहिल विजय चोपडा, वैभव शांतीलाल चोपडा या दोघा चुलत्या पुतण्यासह लोणीतून फिरोज पठाण अश्या चौघांना विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केले,
तपासादरम्यान जिल्हाच्या बाहेरही हे गुटखा कनेक्शन असल्याने त्यादृष्टीने पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. मात्र स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अर्ध्या कोटींहून अधिक गुटखा जप्त झाला, त्या ठिकाणच्या मालक, चालकांपर्यंत गुटखा छापा होऊनही चार दिवस होऊनही पोलीस प्रशासन अद्यापही पोहचलेले नसल्याचे दिसून येत आहे.
या गुटख्याच्या अवैध व्यवसायात तीन प्रमुख भागीदार असल्याचे बोलले जात आहे, हे तिघे अनुक्रमे बेलापूर, एकलहरे व संगमनेरचे आहे. यापैकी संगमनेरचा जावई हा आपल्या बेलापूरच्या सासर्यासोबत संलग्न राहून एकलहरेतील तिसर्या भागिदारासोबत जावई कोल्हार मार्गे गुलाबाच्या बागेलगद असलेल्या पत्र्याचा शेडमध्ये मध्यरात्री मोठमोठ्या ट्रकभर गुटख्याच्या साठवणूक करीत असे व एकलहरेतील भागीदार आपल्या तीन भावांच्या मदतीने रातोरात श्रीरामपूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुटखा वितरणाचे काम करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
ज्या ठिकाणी गुटखा साठवून अवैध व्यवसाय चालू होता, त्याच्या लगद गुलाबाचा बाग असल्याने गाडीच्या आतील भागात गुटख्याच्या गोण्या व बाहेरील बाजूस गुलाबाचे फुले भरून वाहतूक होत असल्याचे परिसरात बोलले जात आहे.
या प्रकरणात जे प्रमुख मोहरके आहे तेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून परिसरात वावरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खर्या अर्थाने या प्रकरणाचा तपास झाल्यास या गुटखांकिंगचा बुरखा फाडला जाणार आहे.
भटक्या विमुक्त जातीच्या व्यक्तीने लगदच्याच वरील एकाला कराराने क्षेत्र दिल्याचेही बोलले जात आहे. पोलीस प्रशासनाने काल स्थानिक तलाठ्यांच्या मदतीने छापा ठिकाणच्या मालकासंदर्भात सखोल चौकशीला सुरुवात केली असून, रात्री उशिरापर्यंत मूळ मालकाकडे चौकशी करून यानेही वरील पैकी एकाला हे क्षेत्र कराराने दिल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजले आहे.
संगमनेर जावई कनेक्शन चर्चेत
एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत सापडलेल्या अर्ध्या कोटींहून अधिक गुटखा प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात संगमनेर येथील जावई असल्याची चर्चा किरकोळ गुटखा विक्रेत्यांमध्ये आहे. त्यादृष्टीनेही अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी पोलीस प्रशासनाला सखोल चौकशीचे सूचना दिल्या आहे.