श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
सरकारने जीएम पिकांना परवानगी द्यावी ही मागणी करत शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने श्रीगोंदा फॅक्टरी येथे प्रतिबंधित बी टी वांग्याची जाहीर लागवड करून सविनय कायदेभंग करत किसान सत्याग्रह केला.
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या शेतात बी टी वांग्याची लागवड करण्याचे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो शेतकर्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली, जगभर जनुक सुधारित पिकांना, जेनिटिकली मॉडिफाईड (जी एम) वाणांना मान्यता देण्यात आली आहे मात्र भारतात फक्त कपाशीच्या बोलगार्ड 1 व बोलगर्ड 2 या जातींनाच मान्यता देण्यात आली आहे. इतर पिकांना व कपाशीच्या तणनाशक रोधक, गुलाबी बोंडअळी रोधक जातींना मान्यता नाही. इतर ही पिकांमध्ये ही उत्पादन वाढवणार्या, पण्याचा ताण सहन करणार्या, खारवट जमिनीत येणार्या व अधिक सकस अन्न देणार्या जाती तयार आहेत. त्या अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकविल्या जातात व तेथील शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत. जगभर या वाणांना मान्यता देण्यात आली आहे. भारतात मात्र यास बंदी आहे. ही बंदी मोडून काढणयासाठी हा सविनय कायदेभंग आहे.
याप्रसंगी सीमा नरोडे, रामजिवन बोंदर, सतीश दाणी, सुधीर बिंदू, मधुसूदन हरणे, विजय निवल यांनी मार्गदर्शन केले. किसान सत्याग्रहामध्ये सामील होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.