अहमदनगर (प्रतिनिधी) – सर्जेपुरा रोड ते बागडपट्टी व बागडपट्टी ते नेता सुभाष चौकातील रस्ता खोदल्याने त्याची पुन्हा दुरुस्ती न झाल्याने मागील एक ते दोन महिन्यांपासून स्थानिक नागरिक, दुकानदार व व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील हायमॅक्स व काही पथदिवे बंद अवस्थेत असल्याने अंध:कार पसरला आहे. सणासुदीचे दिवस असल्याने रस्त्याचे काम व हायमॅक्स, पथदिव्यांची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक नागरिक व दुकानदारांच्यावतीने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले.
यावेळी बागडपट्टीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर, किरण डफळ, अजय दराडे, कुणाल गोसके, वरुण मिस्कीन आदी उपस्थित होते. आयुक्त मायकलवार यांनी दोन दिवसांत रस्त्यावरील मातीचे ढिगारे उचलण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश दिले असून, रस्ता तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले.सर्जेपुरा रोड ते बागडपट्टी व बागडपट्टी ते नेता सुभाष चौकातील रस्ता खोदल्याने त्याची पुन्हा दुरुस्ती न झाल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी सदर भागात ड्रेनेज लाईन, पाईप लाईन टाकण्याचे कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. हे काम पूर्ण होऊन महिना झाला आहे. संबंधित ठेकेदाराच्या कर्मचार्यांनी खड्ड्यात माती लोटून निघून गेले आहेत. रस्त्याच्या शेजारी असलेले मातीचे ढिगारे व दगड, धोंडे उचलण्यात आलेले नाहीत. हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून, मातीचे ढिग न उचलल्याने संपूर्ण परिसर धुळीने माखला असल्याची तक्रार करण्यात आली आहे.