Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रअध्यक्षांच्या दालनात काय घडले ? का झाले भाजपच्या १२ आमदारांने निलंबन ?

अध्यक्षांच्या दालनात काय घडले ? का झाले भाजपच्या १२ आमदारांने निलंबन ?

मुंबई :

ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या (monsoon session) पहिल्याच दिवशी विधानसभेत घामासान झाले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात तुफान राडा झाला. यासंदर्भातील एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी ट्वीट केला. भाजप (‌bjp) आमदारांनी अध्यक्षांच्या दालनात कशाप्रकारे राडा घातला, असे सांगत मलिक यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला.

- Advertisement -

आज सभागृहात ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरुन गोंधळ झाला. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली त्याचबरोबर शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहे. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज १० मिनिटे स्थगित केले. या विषयावर अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला. अध्यक्षांच्या दालनात काय घडले याबाबत नवाब मलिक यांना व्हिडीओ ट्वीट केला. विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

हे आहेत भाजपचे निलंबित आमदार

आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

१०६ आमदारांना निलंबित केले तरीही लढा देत राहू

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका सरकारने खरी केली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडे पाडले आहे. या मुद्द्यावरुन सरकार अपयशी ठरले असल्याचे आम्ही सरकारला दाखवले यामुळेच त्यांनी खोटी स्टोरी रचून खोटे आरोप लावून १२ आमदरांना निलंबित केले आहे. तसेच ओबीसींसाठी १२च आमदार काय आम्ही १०६ आमदारांना निलंबित केले तरीही लढा देत राहू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

राजदंड पळवण्यावरुन गोंधळ

आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीचे भान ठेवतात आमदार आशिष शेलार यांनी संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेलमधून आपल्या जागेवर नेलं. त्यानंतर थोडावेळ कामकाज तहकूब करण्यात आलं. मात्र राजदंड पळवण्यावरुन सुरु झालेल्या गोंधळातून नंतर अध्यक्षांच्या दालनाबाहेर धक्काबुक्कीही झाली. याच साऱ्या गोंधळानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर १२ आमदारांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली.

भास्कर जाधव म्हणाले…

सभागृहात अनेक वादाचे प्रसंग येतात, वाद होत असतात. पण त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सदस्य शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हते. इतर सदस्यांनी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. राडेबाज करणाऱ्या गुंडाप्रमाणे ते धावून आले, असा खळबळजनक दावा विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सोमवारी सभागृहातील वादानंतर केला.

सभागृहात वाद झाला असला तरी बाहेर गेल्यावर आपण राजकीय व्यक्ती आहोत. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी दालनात गेलो तेव्हा उपाध्यक्षांनी मला बसण्यास सांगितले. तितक्यात रागाच्या भरात फडणवीस आले. मी त्यांना बोलू दिले नसल्याने त्यांचा राग असणे स्वभाविक आहे. सभागृहात अनेक वादाचे प्रसंग येतात, मी तुम्हाला पुन्हा बोलायला देईन असे मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी फडणवीस आणि भाजपचे सदस्य शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हते. इतर सदस्यांनी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. राडेबाज करणाऱ्या गुंडाप्रमाणे ते धावून आले, असे जाधव म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या