जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांचे समाजसुधारणेसाठी बलिदान दिले. शहीद नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता 7 वर्षे पूर्ण झाले आहेत.
हत्येतील आरोपी तपास यंत्रणेला गवसले. मात्र, त्यांचे सूत्रधार अद्यापही मोकाट व पडद्याआड आहेत. त्यांना शोधून अटक करण्याचे धाडस अद्यापि प्रशासनाला जमलेले नाही. याबाबत अंनिसने विविध हिंदुत्ववादी संघटनावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे तपास यंत्रणेने सूत्रधारांना तत्काळ अटक करावी आणि त्यांना जनतेसमोर आणावे, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली आहे.
याबाबतची माहिती गुरुवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे (शहादा), डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक),जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रात समाजसुधारणेची 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षे पूर्ण केली. या 31 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन, विवेकवाद, जात पंचायत निर्मूलन, आंतरजातीय विवाह, पर्यावरण, महिलांचे धार्मिक क्षेत्रातील शोषण, मानवतावाद, भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार, खगोलशास्त्र, फलज्योतिष, युवा विकास, वैज्ञानिक दृष्टीकोन आदी विषयावर काम करीत असताना बदलाची मोठी क्रांती घडवून आणली आहे.
सुमारे 300 पेक्षा अधिक शाखा उभारून समाज सुधारणेची क्रांती करणारे देशातील एकमेव महाराष्ट्र अंनिस हे संघटन आहे. प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दाभोलकर यांनी 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांचे बलिदान दिले. 7 वर्षे उलटले; आता तरी सूत्रधारांना अटक करावी, अशी अंनिसची मागणी आहे.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना योग्य वेळी अटक होऊन त्यांच्या खुनाचा तपास सूत्रधारापर्यंत पोहचला असता तर त्यानंतर झालेले कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा.एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खुन झाले नसते.
म्हणूनच अजुनही तपासात होत असलेली दिरंगाई अक्षम्य आहे. सरकारने तपास वेगाने करुन सूत्रधाराचा शोध द्यावा, अशी मागणी केली. यावेळी अशोक तायडे, सुनील वाघमोडे, आर.वाय.चौधरी, मोहन मेढे, जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी, अॅड.भरत गुजर उपस्थित होते.