नाशिक । प्रतिनिधी Nashik
दिवाळी 3-4 दिवसांवर आली आहे. घराघरातून फराळाचा खमंग सुवास दरवळत आहे. रांगोळ्यांनी बाजार रंगला आहे. ‘देशदूत’च्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत रांगोळीपासून फराळापर्यंतचे कानमंत्र…
चकली, लाडू, करंज्या, चिरोटे, अनारसे ह्यातले काही पदार्थ आकाराने छोटे करावेत. कारण, दिवाळीच्या दिवसात सर्वांकडे हेच पदार्थ असतात आणि ते खाल्लेही जात असतात. त्यामुळे आपल्याकडे आल्या गेल्याला दिले तर ते एखादाच तुकडा तोडतात, मग उरलेल्याचे काय करावे हा प्रश्न पडतो. तो प्रश्न असा सोडवावा. केलेले पदार्थ दोन डब्यांमध्ये ठेवावेत म्हणजे सारखे हात लागून चबढब होत नाही आणि टिकतातही चांगले.
रोज एक वेळखाऊ अवघड आणि दोन सोपे पदार्थ करावेत. उदा : सकाळी चिवडा करून चकलीचे पीठ भिजवून ठेवावे आणि नंतर सवडीने चकल्या कराव्यात. तसेच चिरोटे-शंकरपाळे, रवा लाडू, करंज्या, शेव- कडबोळी, मठरी-बेसन लाडू असा लावला तर पदार्थ करणे सोपे जाते.
दिवाळीच्या आधीच सगळा फराळ करावा आणि आपणही मस्त दिवाळी एन्जॉय करावी. ज्यांना घरी पदार्थ करणे शक्य नसेल त्यांनी बाहेरून घेताना आधी चव बघून मगच ऑर्डर द्यावी. पण शक्यतो घरच्यासाठी खाण्याचे पदार्थ तरी घरीच करावेत कारण आपल्याला आपल्या माणसांच्या तिखट, मीठ, गोड चवीची पुरेपूर कल्पना असते.
आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर