धुळे – Dhule – प्रतिनिधी :
गेल्या आठवड्यात वादळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून धुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना …
भरपाई मिळावी, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मागील आठवड्यात दि. 5 सप्टेंबर रोजी धुळे तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. धुळे तालुक्यात ऑगस्ट अखेरीपर्यंत सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचून खरीपाची पिके पाण्यातच उभी होती, परिणामी अतिपावसामुळे उत्पन्नात प्रचंड घट होण्याची भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झालेली असतांनाच दि. 5 सप्टेंबर रोजी वादळी वार्यासह अतिवृष्टीचे संकट शेतकर्यांसमोर उभे ठाकले आहे.
जून ते सप्टेंबरपर्यंत झालेला सततच्या अतिपावसामुळे कापसासह खरीप पिकांवर लाल्या, मावा, तुडतुडे अशा रोगांचा प्रादुर्भावही झालेला आहे. आणि 5 सप्टेंबर रोजी झालेली अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करणे आवश्यक आहे, मात्र स्थानिक महसूल विभागाने दि. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या या एकाच दिवशी पडलेल्या पावसाचा निकष लावून अद्यापपर्यंत पंचनामा केलेला नाही.
वादळी पाऊस व अतिवृष्टीमुळे धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकर्यांची खरिपाच्या पिकासह मिरची, पपई, डाळिंब, शेवगा, आदी फळपिके व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकर्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामा करावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली आहे.
वादळी व मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांचे छत उडाले आहेत तसेच काहींच्या भिंती कोसळून घरासह संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होऊन अनेकांना बेघर व्हावे लागले आहे, तसेच वादळामुळे शेतकर्यांच्या कांदा चाळीचे लोखंडी पत्रेही उडाल्यामुळे पावसाचे पाणी शेतकर्यांनी साठवलेल्या कांद्यात शिरल्याने त्याचेही प्रचंड आर्थिक नुकसान शेतकर्यांना सोसावे लागत आहे, म्हणून शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी आपल्या पत्राद्वारे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री ना. दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केलेली आहे.