दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये बऱ्याच दिवसांपासून अनेक बड्या स्टार्सच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्या वर्षी नागा चैतन्य आणि (सामंथा रुथ प्रभू) त्यांचे चार वर्षे जुने लग्न मोडून कायमचे वेगळे झाले.
त्याचवेळी, आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत आणि ‘अतरंगी रे’ स्टार धनुष यांनी त्यांचे १८ वर्ष जुने नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याने रात्री उशिरा घटस्फोटाची घोषणा केली, जी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
धनुषने पोस्टमध्ये लिहीलं आहे, १८ वर्षांचा सहवास, मैत्री, एक चांगले कपल होणे, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक, आमची ग्रोथ, समजूतदारपणाचा, एकत्र प्रवास आम्ही केला. मात्र, आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर आज, आम्ही जिथे उभे आहोत तिथून आमचे मार्ग वेगळे होत आहेत.
ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आम्ही स्वत:ला शोधण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमची प्रायव्हसी लक्षात घेऊन आम्हाला आमच्या या निर्णयाशी डील करू द्या.
ऐश्वर्यानेही आपल्या ट्विटर पोस्टमध्ये फक्त तुमची समज आणि तुमचे प्रेम आवश्यक आहे, अशा आशयाची पोस्ट केली आहे. धनुषने शेअर केलेलीच पोस्ट ऐश्वर्यानेही शेअर केली आहे.
धनुषने अभिनेता रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याशी १८ नोव्हेंबर २००४ रोजी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते. तेव्हा धनुष अवघ्या २३ वर्षांच्या होता. दोघांची पहिली भेट ही २००३ मध्ये एका फिल्मच्या सेटवर झाली होती.
पारंपारिक तमिळ रितीरिवाजानुसार हे लग्न पार पडले. धनुष आणि एेश्वर्याला दोन मुले आहेत. या मुलांचे नाव यत्र आणि लिंगा आहे.
धनुष हा सुप्रसिद्ध निर्माती कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष बहुप्रतिभावान आहे. अभिनेता असण्यासोबतच ते दिग्दर्शक, निर्माता, नर्तक, पार्श्वगायक, गीतकार आणि पटकथा लेखक देखील आहेत.
४६ चित्रपटांमध्ये काम केलेल्या सुपरस्टार धनुषला आतापर्यंत एक फिल्मफेअर पुरस्कार, ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह १३ मोठे पुरस्कार मिळाले आहेत.