संगमनेर (प्रतिनिधी) –
तालुक्यातील कोकणगाव येथे पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकुलाचे बांधकाम बेकायदेशिरपणे पाडणार्या पाच जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण कृष्णाजी पवार (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) यांनी त्यांच्या वडीलोपार्जित जागेत घरबांधण्याच्या दृष्टीने पंतप्रधान घरकुल योजनेतंर्गत चार वर्षापूर्वी प्रस्ताव टाकला होता. तो मंजुरही झाला. घर बांधकाम सुरु झाले. सुमारे एक वर्षापासून बांधकाम सुरु आहे. मात्र वेळोवेळी बाळू कचरु पवार, सोमनाथ बाळू पवार, भाऊसाहेब भिमा पवार, प्रमोद भिमा पवार, चंद्रकांत मोहन पवार (सर्व रा. कोकणगाव) यांनी बांधकामाचे साहित्य आणण्यास अडथळा आणला. सदर घरकुलाचे बांधकाम हे प्लिथं चे वरती सुमारे चार पाच फुट वीट बांधकाम झाले. दरवाजाचे चौकटी फिटींग केल्या. 6 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी बांधकामावरुन लक्ष्मण पवार हे घरी निघून गेले.
दुसर्या दिवशी सकाळी ते पुन्हा बांधकामाकडे आले तेव्हा वरील पाच जण हे चालु घराचे बांधकामाच्या भिंती व चौकटी पाडून नुकसान करत असल्याचे दिसले. लक्ष्मण पवार व त्यांची आई, भाऊ, पत्नी हे तेथे गेल्यानंतर वरील पाचही जण बांधकामाचे नुकसान करुन पळून गेले होते. याबाबतची फिर्याद लक्ष्मण पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी बाळू कचरु पवार, सोमनाथ बाळू पवार, भाऊसाहेब भिमा पवार, प्रमोद भिमा पवार, चंद्रकांत मोहन पवार (सर्व रा. कोकणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 149/2021 भारतीय दंड संहिता 1860, कलम 143, 147, 452, 427 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेर हे करत आहे.
दरम्यान लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. घरकुल योजनेतील घरकुल पाडणार्या इसमांवर कारवाई न झाल्यास 22 एप्रिल रोजी कोकणगाव ग्रामपंचायतीसमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत तहसिलदार, संगमनेर यांना देण्यात आली आहे.