नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोना संकटामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ५० टक्के प्रवाशी वाहतूक सुरू असून त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.
या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी परिवहन मंत्री व शासनाकडे केली आहे.
20 ऑगस्टपासून राज्यातील जिल्हाअंतर्गत ५० टक्के प्रवाशी संख्येवर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 50 टक्के प्रवाशी संख्येवर वाहतूक करताना महामंडळास उत्पन्नही अल्प प्रमाणातच मिळते आहे. परिणामी महामंडळाच्या तोट्यात अधिकची भर पडत आहे.
महामंडळ आर्थिक संकटात असल्याने सेवकांचे वेतन व दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मे २०२० पर्यंत शासनाकडून महामंडळास देय होणार्या सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीची रक्कम शासनाने दिल्यामुळे सेवकांचे काही प्रमाणात वेतन दिले आहे.
सवलत मूल्यांची रक्कम शासनाकडे शिल्लक नसल्यामुळे शासनाने ऑगस्ट २०२० मध्ये सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीची भविष्यात देय होणार्या रक्कमेतून उचल म्हणून ५५० कोटी रुपये महामंडळास दिल्याने सेवकांना जून २०२० पर्यंतचे वेतन देता आलेले आहे.
यामुळे महामंडळास झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळणे आवश्यक आहे. 50 टक्के प्रवाशी संख्येवर वाहतूक सुरू केल्याने महामंडळास होणार्या आर्थिक नुकसानीची भरपाई शासनाने मदत म्हणून रा. प. महामंडळास करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.