नाशिक । प्रतिनिधी
गेल्या सव्वा वर्षापासून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत होण्यासोबत शैक्षणिक क्षेत्रही प्रभावित झाले आहे. जून महिना उजाडल्यानंतरही शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागांच्या प्रवेशप्रक्रियेला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागांवर शैक्षणिक वर्ष 2021-22 याकरिता प्रवेशाची प्रक्रिया वेळेवर सुरू झाली होती. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेलाही प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशासाठी सोडत काढण्यात आली. तर, 15 एप्रिलपासून पालकांना एसएमएस प्राप्त होण्यास सुरुवात होईल, असेही कळविले होते. मात्र, करोनाच्या दुसर्या लाटेत प्रादुर्भाव वाढत गेल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया रेंगाळली आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जून-जुलैपर्यंत प्रवेश रखडण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान, लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिली जाईल. पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, अशी सूचना शिक्षण विभागाने जारी केली आहे. तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आलेल्या जिल्ह्यांत तरी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
राज्यातील आरटीईची स्थिती –
शाळा : 9,432,
उपलब्ध जागा : 96,684,
प्राप्त अर्ज : 2,22,584,
लॉटरी निवड : 82,129