कळवण । प्रतिनिधी
कळवण तालुक्यात काल सायंकाळी वादळी वार्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने भेंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्ग खोल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका आहे. या वर्ग खोल्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भेंडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत एकूण 174 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सध्या करोना संकटामुळे शाळा बंद आहे. तालुक्यात वादळी वार्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाला आहे.
या वादळात व गारांच्या पावसामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. या शाळेच्या व्हरांड्यामधील सिमेंट पत्रे उडाले आहे. खोल्यांवरील पत्र्यांना तडे जाऊन पत्र फुटले आहे. काही भिंतींनाही नुकसान पोहचले आहे.
या ठिकाणी वर्ग भरणे अशक्य आहे. या ठिकाणी अनलॉकनंतर पुन्हा शाळा सुरु झाल्यास पत्रे फुटलेल्या शाळेत विद्यार्थी बसल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात न घालता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी पाहणी करून तत्काळ या शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या शाळेच्या सात वर्ग खोल्या आहेत. या वर्गांचे निर्लेखन करण्यासाठी शाळेने 2018 पासून पंचायत समितीच्या गटशिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरु आहे. आज पुन्हा दुरवस्था झालेल्या शाळेचे फोटो सादर करून स्मरणपत्र दिले जाईल.
जिभाऊ निकम, मुख्याध्यापक
भेंडी येथी जि . प .शाळेसारखी तालुक्यातील देसगाव, चोळीचा माळ, उंबरेमाळ, मोरेढुबसह अशा अनेक शाळेच्या वर्ग खोल्यांचे दुरावस्था नुकसान झाले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात न घालता शासनाने या वर्गखोल्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देत तत्काळ दुरुस्ती करावी.
अंबादास जाधव – शिवसेना तालुकाप्रमुख