अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत आलेला निधी अन्य ठिकाणी वापरला जात आहे. त्यामुळे मूळ दलित वस्तीत राहणार्या नागरिकांवर अन्याय होत असल्याची तक्रार नगरसेविका शीला दीप चव्हाण व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबत जिल्हाधिकारी नगरपालिका शाखेच्या वतीने आयुक्तांना दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते चव्हाण यांनी दिली.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून महापालिकेत प्रभाग क्रमांक 9 मधून शीला चव्हाण निवडून आलेल्या आहेत. त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीबद्दल नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. शहरात नगरपरिषद असताना 17 अघोषित व 5 अघोषित झोपडपट्टया असून, हे सर्व दलित बहुल भाग आहे. 2019 पासून 2022 पर्यंत दलित सुधार योजनेसाठी आलेला निधी दलित वस्तींमध्ये वापरणे आवश्यक आहे. 2020-2021 साठी महापालिकेला 5 कोटी 11 लाख 72 हजार 576 चा निधी आला होता. या निधीमधून 48 कामे दाखविण्यात आली.
मात्र यापैकी फक्त 7 कामे दलित वस्तीत करण्यात आलेली असून, त्याला एक कोटीपर्यंत खर्च करण्यात आला आहे. उर्वरीत 41 कामे ही इतर ठिकाणी करुन तब्बल चार कोटीपर्यंतची कामे दलित वस्ती सोडून करण्यात आलेली आहे.तसेच 2021-2022 वर्षासाठी महापालिकेने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी 6 कोटी पाचशे रुपयाचा निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविला आहे. या कामाच्या यादीत 38 कामे समाविष्ट असून, फक्त दोन कामे ही दलित वस्तीमधील असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे.