Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआळंदीसह परिसरातील ११ गावांत उद्यापासून संचारबंदी

आळंदीसह परिसरातील ११ गावांत उद्यापासून संचारबंदी

पुणे | Pune

आषाढी, कार्तिकी वारीनंतर आता दरवर्षी तीर्थक्षेत्र आंळदी येथे होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर करोनाचे सावट निर्माण झाले असून आळंदीत उद्यापासून अर्थात ६ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

- Advertisement -

यावर्षीची यात्रा आळंदीत भाविकांविना होणार असून संचार बंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापने बंद राहणार असल्याने व्यापारी नागरिकांमध्ये मात्र नाराजी आहे. संचारबंदीचे काळात भाविक, नागरिक, वारकरी यांनी सहकारी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या वर्षीचे यात्रेवर करोनाचे सावट असल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी यावर्षी आळंदी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्याचा भाविकांचे उपस्थितीत करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यासाठी काही वारकऱ्यांची उपस्थिती तसेच त्यासाठी प्रशासनाने अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. बंधनात तसेच संचारबंदीचे सावटात आळंदी कार्तिकी यात्रा होणार आहे. यासाठी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक देखील आळंदी मंदिरात झाली.

आळंदी कार्तिकी यात्रेस परंपरेने येणाऱ्या दिंड्यांतील पंढरपूर येथून तीन दिंड्यांतील प्रत्येकी वीस वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आळंदीसह पंचक्रोशीतील ११ गावात संचारबंदी आदेश असल्याने धर्मशाळेत वारकर्‍यांना आणि भाविक भक्तांना राहण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. इंद्रायणी नदीचे परिसरात संचारबंदी व कालावधीत भाविकांना स्नान करण्यास बंदी घातली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या बाहेर इतर ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी असून माऊली मंदिरात पास शिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्याच मान्यवर भाविकांच्या उपस्थितीत होणार आहेत. कार्तिकी यात्रा कालावधीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन कोणालाही करता येणार नाही. मंदिरात प्रवेश करताना मास्कचा वापर, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे बंधन राहणार आहे.

कार्तिकी काळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी वतीने परंपरेचे कार्यक्रम सोशल मीडिया, युट्युब, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्यास आदेशित करण्यात आले आहे. भाविकांना ऑनलाईन दर्शन मिळेल यासाठी उपाययोजना करण्याचे संस्थानला पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांचे सुधारित आदेशाने बजाविण्यात आले आहे. या वर्षीची कार्तिकी यात्रा भाविक, वारकरी यांचे शिवाय होणार असल्याने व्यापारी नागरिकांत नाराजी आहे. स्थानिक व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याची गरज असल्याचे व्यापारी नागरिकांतून सांगितले जाते.

ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून आळंदी संस्थानला सशर्त परवानगी पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांनी राज्य शासनाचे नियंत्रणात दिली आहे. यासाठीचे आदेश त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. यात पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयास कार्तिकी यात्रा काळात आळंदी व पंचक्रोशीतील १२ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचे आदेश पारित करण्यास आदेश दिले आहेत.

यामध्ये आळंदी, चऱ्होली खुर्द, केळगाव, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळु, मरकळ, चऱ्होली बुद्रुक, डूडूळगाव या गावांमध्ये ६ ते १५ डिसेंबर २०२० या दरम्यान संचार बंदी लागू होत आहे. यावेळी हॉटेल व धर्मशाळा, भक्त निवासात भाविक, वारकरी यांना मुक्कामास मनाई ठेवली आहे. माऊली मंदिरात कीर्तन व भजन, जागर करण्यास १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांचा मुक्काम संस्थांनचे नियोजनाप्रमाणे राहणार आहे. राज्यातून विविध भागातून परंपरागत सेवेकऱ्यांची सेवा माऊलीं मंदिरात होणार आहेत.

अशा सेवेकऱ्यांच्या सेवेसाठी ५ व्यक्तींना निमंत्रित करण्यास कलविणेत आहे आहे . सेवा झाल्यानंतर परत गावी जावे लागणार आहे. श्री पांडुरंगराय, श्री संत नामदेवराय व भक्त पुंडलिक या दिंडी पालख्यांना आळंदीत शासनाचे आदेशाने प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्याच्या प्रवेश हद्दीवर परवानगी नसलेल्या येणाऱ्या दिंड्याना व वाहनांना आळंदीकडे सोडले जाणार नाही. परत पाठविले जाणार आहे. प्रवासी वाहतूक वाहने बंद ठेवली जाणार आहे. इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी असणार आहे. मंदिरातील समाधी सोहळ्याच्या मंदिरात येणाऱ्या मानकरी, सेवेकरी, वारकरी यांची रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या काळात वारकऱ्यांचा आळंदीत मुक्काम असतो. ही परंपरा कायम ठेवत पंढरपूरातून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या श्री. पांडुरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या तीन दिंड्यांना राज्य शासनानं परवानगी दिली आहे. तीनही दिंङ्यांसोबत प्रत्येकी वीस लोकांना आळंदीत येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तीन दिंड्यांसाठी स्वतंत्र एसटी बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या