Sunday, April 28, 2024
Homeब्लॉगगारपिटीची चिकित्सा

गारपिटीची चिकित्सा

एप्रिल-मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस आणि गारा पडणेही नवे नाही. परंतु अलीकडील काळात मैलोगणती होणारी गारपीट, अवकाळी पावसाचे वाढते प्रमाणही चिंताजनक आहे. हवामान बदलाचे दृश्य परिणाम म्हणून याकडे पाहतानाच त्यापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यापक विचार होणे गरजेचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहणारी पिके तयार करण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश होतो.

महाराष्ट्रात गेल्या 8-15 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे कृषी क्षेत्राला खूप मोठा फटका बसला आहे. आताच्या पावसाचे कारण हे पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) हे आहे. यामध्ये उत्तरेकडून वारे आपल्याकडे वाहत येतात. येताना बाष्पही घेऊन येतात आणि त्यामुळे हा पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी एल निनोचा प्रभाव दिसून येणार असल्याचे भाकित हवामान संस्थांकडून वर्तवण्यात येत आहे. ढोबळमानाने सांगायचे झाल्यास हिंदी महासागरावरील बाष्प पॅसिफिक महासागराकडे ओढले जाण्याची प्रक्रिया एल निनोच्या वर्षांमध्ये घडताना दिसून येते. एल निनो सक्रिय नसेल किंवा ला निना स्थिती असेल तर अगदी सहजतेने प्रशांत महासागरावरील बाष्प भारतीय उपखंडाकडे येते. यावर्षी गुजरात, राजस्थानमध्ये तयार झालेले वातावरण हे विस्तृत प्रमाणावर पूर्वमान्सून पाऊस पडणार याचे संकेत देणारे होते. त्यानुसार हवामान विभागाकडूनही तसे इशारादर्शक अंदाज दिले गेले; परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर गारपीट होणे हा प्रकार असामान्यच म्हणावा लागेल. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या अवकाळीने राज्यातील 14 जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 1 मार्च ते 9 एप्रिल याकाळात देशात 28 टक्के पावसाची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाला आहे. हे प्रमाण 80 टक्के इतके आहे. या पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, मका, फळबागा, भाजीपाला आदी सर्व पिकांची मोठी हानी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या आंब्याच्या हंगामालाही याचा फटका बसला आहे. सध्या झालेल्या फळधारणेपैकी 75 टक्के हापूस आंबा गळून पडत आहे.

अवकाळी आणि गारपिटीच्या वाढत्या घटनांपासून बचावासाठी ठोस यंत्रणा उभी करणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. साधारणतः हवामान बदलापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेडनेट उभारण्यात येतात. परंतु 2013 साली वैजापूर गावातील पिंपळगाव येथे इतकी भयानक गारपीट झाली की श्रीरामपूर-वैजापूर रस्ता बर्फवृष्टी झाल्यासारखा पांढरा शुभ्र झाला होता. या गारपिटीने शेडिंग नेट पूर्णपणे फाटून गेल्या. यंदाही तशीच स्थिती अनेक ठिकाणी दिसून आली आहे. नाशिक जिल्ह्यात दातेगाव परिसरात मी गेलो असता तेथे सुपारीएवढ्या गारा पडताना मी पाहिल्या. पश्चिमी विक्षोभामुळे एकत्रित झालेल्या बाष्पाला गार वारे लागल्यानंतर हे बाष्प अक्षरशः गोठते आणि जमिनीवरील दाब कमी झाल्यामुळे त्या गारांच्या स्वरुपात फार वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतात. त्यांची तीव्रता आणि घनता जास्त असल्यामुळे झाडांचा पाला गळून जाणे, पिकांची प्रचंड हानी होणे, फळे गळून पडणे असे प्रकार दिसतात.

- Advertisement -

ही सर्व परिस्थिती जागतिक तापमानवाढीच्या आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांचा परिपाक आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी किंवा या संकटांचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक पातळीवर काही प्रयोगही सुरू आहेत. पण ते वेगळ्या स्वरुपाचे आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यास या तापमानाच्या प्रभावाला अनुकूल शेती करता येईल का? यादृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत दक्षिण भारतामध्ये एक प्रयोग सुरू असून त्यामध्ये प्रामुख्याने गव्हाबाबत संशोधन सुरू आहे. त्यानुसार पृथ्वीवरील तापमान कमालीचे वाढले आणि गहू पिकाला फटका बसला तर गव्हाच्या पिठासाठी कंदांचा वापर करता येईल का यादृष्टीने विचार आणि संशोधन सुरू आहे. कारण गहू हे आपल्या एकूण कृषी उत्पादनामधील महत्त्वाचे पीक आहे. अर्थात, अशा प्रयोगांचे, संशोधनाचे प्रमाण हे संकटाच्या व्यापकतेच्या, तीव्रतेच्या तुलनेने खूप कमी आहे.

असे असले तरी वारंवार येणार्‍या या आपत्ती खरोखरीच विचार करायला लावणार्‍या असून त्याची चिकित्सा आवश्यक बनली आहे. कारण गारपीट एखाद्या गावात, कोपर्‍यात होणे समजू शकतो, पण मैलोगणती क्षेत्र गारपिटीच्या कचाट्यात सापडणे, अत्यंत तीव्रतेने पाऊस पडणे या घटना दुर्मिळ स्वरुपाच्या आणि यापूर्वी कधी न दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची गरज अनिवार्य आहे. या सर्व परिस्थितीत पीक पद्धतीचाही फेरविचार करावा लागणार आहे. तसेच शेतकर्‍यांनी भांडवली गुंतवणूक किती करावी याबाबतही विचार करणे आवश्यक आहे.

पीकविमा हे यावरचे उत्तर असू शकत नाही. तसेच अशाप्रकारचा पाऊस पडून नुकसान झाल्यास त्याबाबत विम्याचे निकष काय असावेत, हेही आता नव्याने ठरवावे लागणार आहे. कारण इतर वेळी होणारे नुकसान आणि गारपिटीने होणारे नुकसान यामध्ये मूलभूत फरक आहे. एखाद्या शत्रूचा हल्ला झाल्यावर ज्याप्रकारे संपूर्ण लोकवस्ती उद्ध्वस्त केली जाते तशा प्रकारे गारपीट हा निसर्गाचा शेतीवरील कोप आहे. गारपिटीनंतर अक्षरशः त्या भागातील शेतीमध्ये काहीही शिल्लक राहत नाही. अशावेळी आपल्या विम्याबाबतच्या साचेबद्ध पद्धती बदलाव्या लागतील.

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची व्यापकता पाहिल्यास बाधितांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सरकारबरोबरच समाजानेही पुढे येणे गरजेचे आहे. ज्याच्या शेतात गारपीट झाली त्याला आपण एकटे नाहीत, असे वाटले पाहिजे. यासाठी समाजाचा पाठिंबा मोलाचा आहे. शेवटी हे शेतकरी म्हणजे केवळ माणसे नसून हजारो वर्षांचे कौशल्य त्यांच्या कर्तृत्वामध्ये आहे. हे कर्तृत्व न हरवण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. समाजाचा पाठिंबा असेल तरच कुठलेही सरकार त्या संकटाचा ताकदीने सामना करू शकते, हे लक्षात घ्यायला हवे.

या घटनांवरून आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे हवामान बदलाबाबतचे आपले ज्ञान अद्यापही तोकडे, अपुरे आहे. या बदलांचे आकलन आपल्याला अजूनही झालेले नाहीयेे. याबाबत वैज्ञानिकांचीही जबाबदारी मोठी आहे. अशाप्रकारचे संकट कधीही येऊ शकते हे लक्षात घेता आपल्या आधीच्या अनुभवावरून अशी परिस्थिती कधी ओढवू शकते, त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा आराखडा तयार करता येऊ शकेल आणि शेतकर्‍यांसोबत त्याविषयी चर्चा करून उपाययोजना करता येऊ शकतील. कोणत्याही गंभीर समस्येची उकल ही वैज्ञानिक प्रयत्नातूनच होत असते. म्हणूनच वैज्ञानिक, शास्रीय अंगाने याचा तटस्थपणे विचार, अभ्यास होणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या