अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोनास्थिती हाताबाहेर गेली असतानाही नागरिकांना याचे अजूनही गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. भिस्तबाग चौकातील प्रशांत कॉलनीमध्ये रविवारी सकाळी 50 ते 60 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ सुरू होता. याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 10 हजार रूपयांचा दंड आकारून कारवाई केली.
जिल्ह्यात दररोज चार हजार रूग्ण संख्या आढळत आहे. यात सर्वात जास्त रूग्ण नगरमध्ये आढळून येत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणा ढासळली आहे. तरीही लोक बेजबादारीने वागतात. लग्न समारंभातून करोनाचा फैलाव होत आहे. यामुळे प्रशासनाने यावर बंधने घातली आहे.
तरीही काही लोकांनी चोरून लग्न करण्याचे नियोजन केले आहे. असाच एक प्रकार भिस्तबाग चौकातील प्रशांत कॉलनीत घडला. लग्न समारंभ सुरू असून 50 ते 60 लोक उपस्थित असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. सहायक निरीक्षक किरण सुरसे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. लग्नासाठी गर्दी जमल्याचे त्यांच्या लक्षात येताच संबंधितांना त्यांनी 10 हजार रूपये दंड केला.