अहमदनगर (प्रतिनिधी) –
करोना जिल्ह्यात थैमान घातले आहे. रोज तीन हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहे. प्रतिदिन सरासरी 40 जणांचा मृत्यू होत आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आहे. तरीदेखील नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरतात.
त्यांना रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. तरीदेखील रस्त्याने विनाकारण करणार्यांचे प्रमाण जास्त आहे. विनाकारण फिरणार्यासमोर गुरूवारी शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे यांनी हात जोडले. सहायक निरीक्षक पिंगळे यांनी नागरिकांना स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनासाठी तरी घरी थांबा, अशी विनंती केली.
पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असली तरी नागरिकांचे फिरणे बंद होत नाही. भाजी, किराणा, मेडिकलच्या नावाखाली लोक दररोज रस्त्यावर येत आहे. शेवटी गुरूवारी पोलिसांनी त्यांना हात जोडून घरात थांबण्याची विनंती केली. पोलिसांनी हात जोडून केलेल्या विनंतीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक किरण सुरसे, उपनिरीक्षक सुरज मेढे हे देखील नागरिकांना घरात थांबण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे.