कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुक्यातील गुरूपिंपरी येथील शेतकर्यांना तयार झालेल्या डाळिंबाच्या बागेवर फवारणी करण्यासाठी दिलेल्या बनावट औषधामुळे 9 एकर क्षेत्रातील डाळिंब बाग उद्वस्त झाली असून शेतकर्यांचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारानंतर कृषी विभगाने छापेमारी सुरू केली असून. संबंधित कंपनीच अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी प्रकाश गावडे व विनोद गावडे या शेतकर्यांनी तक्रार दाखल केली आहे. गावडे यांचे डाळिंब तोडणीला अवघे वीस दिवस राहिलेले असताना फळांवर लाल बिंगी व कुजबा या रोगांचा प्रादूर्भाव झाला यासाठी त्यांना मिरजगाव येथील कृषी विक्रीच्या दुकानातून बायो नावाचे बुरशीनाशक औषध देण्यात आले. शेतकर्यांनी याचीही फवारणी केली मात्र फवारणीनंतर अवघ्या आठ दिवसांत सर्व फळांची गळ होऊन तब्बल नऊ एकर डाळिंब फळे वाया गेली व या शेतकर्यांचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत दुकानदाराला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे गावडे बंधूंनी यासंदर्भात कर्जत तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्यासह जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के व जिल्हा कृषी विभागांमधून शंकर किरवे यांनी गावडे यांना पुरवठा केलेली औषधे त्यावरील कंपनी याची तपासणी केली एवढेच नव्हे तर कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील निविष्ठा विक्री करणार्या पाच कृषी दुकानांवर छापे टाकून तपासण्या केल्या आहेत. तसेच याची चौकशी करण्यात येत आहे.