Friday, April 26, 2024
Homeनगरकरोना सर्वेक्षण कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याकडे लक्ष द्या

करोना सर्वेक्षण कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याकडे लक्ष द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली आहे.

- Advertisement -

या मोहिमेने गती घेतली असून करोनादूत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहीम राबविताना गतिमानतेबरोबरच सर्वेक्षण कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याकडे तालुकास्तरीय यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांशी संवाद साधून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यावेळी उपस्थित होते. तालुकास्तरावरून सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, आरोग्य पथक घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबांची माहिती घेत आहे. मात्र, ही माहिती केवळ गणना या स्वरुपात होता कामा नये. त्यातून जिल्ह्याचे आरोग्यविषयक चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही माहिती अधिक काळजीपूर्वक घेतली गेली पाहिजे.

विशेषत: कुटुंबातील सदस्यांना असणारे आजार, त्रास तसेच ज्येष्ठ नागरिकांना असणार्‍या आरोग्यविषयक तक्रारी आदींची माहिती यामध्ये अपेक्षित आहे. जिल्ह्यात 1 हजार 700 हून अधिक पथकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांना भेट देऊन आरोग्यविषयक माहिती संकलित केली जात आहे. करोनाची लक्षणे जाणवणार्‍या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

पोर्टलवरही अपडेट हवे

बहुतांश तालुक्यांनी ऑफलाईन सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण करत आणले आहे. मात्र, हे काम पोर्टलवर माहिती भरल्यानंतरच त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही माहिती भरण्यास यंत्रणांनी प्राधान्य दिले पाहिजे. कामाची गतिमानता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आरटीपीसीआर चाचणी आणि अ‍ॅन्टीजेन चाचण्यांच्या माध्यमातून तालुकास्तरावर तपासण्या होत आहेत. त्या रुग्णांची नोंद या अहवालात प्रतिबिंबीत होताना दिसत नाही. त्यामुळे अधिक काळजीपूर्वक आरोग्यविषयक सर्वे होण्याची गरज असल्याचे कलेक्टर द्विवेदी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या