मुंबई l Mumbai
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठामध्ये विविध विभागांतर्गत तात्पुरत्या कालावधीकरीता कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाते. मात्र या कामगारांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन दिले जात नाही अशा अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत.
याची दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आढावा घेतला.
सामंत म्हणाले, विद्यापीठामध्ये कुशल, अर्धकुशल, अकुशल गटामध्ये तात्पुरत्या कालावधीकरीता कंत्राटी कर्मचारी आणि कामगार काम करीत असतात त्यांना कामगार कायद्यानुसार वर्गवारीनुसार किमान वेतन मिळाले पाहिजे.
मात्र काही विद्यापीठांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाहीत अशा तक्रारी आहेत. विद्यापीठांनी कामगार कायद्यानुसार त्यांना किमान वेतन द्यावे, त्यामुळे कामगारांच्या सद्याच्या वेतनापेक्षा किमान ४ ते ५ हजारांनी वाढ होऊन त्यांच्या हक्काचे वेतन मिळेल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.