अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे निर्देशानुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेस अंतर्गत सर्व तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस यांच्या संघटनात्मक निवडणुका या महिन्यात पूर्ण करावयाचे असून या निवडणुका अंतर्गत बुथ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या निवडणुका पूर्ण करण्यात येणार आहेत. याकरिता निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने उदयपुर येथील शिबिरात ठरल्याप्रमाणे प्रत्येक पंचायत समिती गणासाठी, स्वतंत्र मंडळ अध्यक्ष व त्याची स्वतंत्र कार्यकारिणी नेमण्यात येणार आहे. तसेच पुढील 100 दिवसात ‘भारत जोडो’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. तरी या सर्व कामाचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक तालुका काँग्रेससाठी जिल्हा काँग्रेसचे प्रभारी म्हणून नेमणुका केल्या आहे.
विधिमंडळ पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे व आ. लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रभारी हे सर्व तालुक्यात जाऊन बैठका घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करणार आहेत.
‘हे’ आहेत निरीक्षक
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निरीक्षक म्हणून गणपतराव सांगळे (श्रीरामपूर तालुका व शहर), प्रा. हिरालाल पगडाल (अकोले) मधुकरराव नवले (संगमनेर तालुका व शहर), सचिन गुजर (नेवासा), अंकुशराव कानडे (शेवगाव), ज्ञानदेव वाफारे (श्रीगोंदा), अॅड. कैलास शेवाळे (जामखेड), अनुराधा नागवडे (कर्जत), अॅड. माणिकराव मोरे (नगर तालुका), भैय्या वाबळे (पाथर्डी), इंद्रभान थोरात (राहता), डॉ. एकनाथ गोंदकर (कोपरगाव तालुका व शहर), ज्ञानेश्वर मुरकुटे (राहुरी), जयंत वाघ (पारनेर), लता डांगे (भिंगार शहर).