अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 व राज्य शासनाच्या वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतलेला आहे.
गतवर्षी लोकसहभागामुळे उत्तम कामगिरी केली आहे. थ्री स्टार मानांकन मिळवले, स्वच्छतेच्या बाबतीत देशात 40 व्या स्थानावर पोहोचलो ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यापुढे जाऊन यावर्षी आपण आणखी प्रयत्न करून नगर शहराला पंचतारांकीत मानांकन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले.
याबाबत मनपा खाते प्रमुखांची नियोजन व आढावा बैठक नुकतीच झाली. त्यात सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे प्रकल्प अधिकारी राहूल अहिरे व सौरभ जाधव यांनी याबाबत सादरीकरण केले.
मानांकनासाठी असलेले विषय सर्वांना विभागून देण्यात आले असून प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडावी, जनजागृती तसेच प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे असे आवाहन आयुक्त मायकलवार यांनी केले.
यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, संतोष लांडगे, सहा. आयुक्त राऊत, परिमल निकम, राम चारठाणकर, प्रवीण मानकर, रोहिदास सातपुते, डॉ. अनिल बोरगे, डॉ. नरसिंह पैठणकर, अभियानाचे शहर समन्वय लक्ष्मण लांडगे, मेहेर लहारे, अशोक साबळे, वैभव जोशी, तडवी, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, प्रभाग अधिकारी आदी उपस्थित होते.