मुंबई | प्रतिनिधी Mumbai
बालमजुरीसारखी (child labour) समाजविघातक अनिष्ठ प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जनतेने एकत्र येवून महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘आंतरराष्ट्रीय बाल मजूरी विरोधी दिनानिमित्त’ (International Day Against Child Labor)राज्यातील जनतेला केले आहे.
राज्यभरातील १४ वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करताना आढळल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय अथवा हेल्पलाईन क्र. १०९८ वर कळवावी. माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवले जाईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
१४ वर्षाखालील सर्व मुलांना घटनेने शिक्षणाचा मूललभूत अधिकार दिला आहे. याकरीता राज्यात १४ वर्षाखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. सर्व लहान मुलांनी शाळेत शिकून स्वत:चे व देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, ही त्यामागील भूमिका आहे. असे असतानाही काही समाजकंटक या कोवळ्या जीवांना बेकायदेशीरपणे स्वत:च्या स्वार्थासाठी कामावर ठेवून त्यांचे शोषण करतात. या कुप्रथेविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे. नागरिकांनी सजगता दाखवून अशा समाजकंटकाची माहिती शासन यंत्रणेस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.
बालमजुरीला भाग पाडणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध खात्रीशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पिळवणूकग्रस्त बालकास पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल, असेही हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.