Thursday, April 25, 2024
Homeनगरडेअरी, किराणा दुकाने, बँका, सोसायट्या, भाजीपाला बाजार करोना संक्रमणाची ठिकाणं

डेअरी, किराणा दुकाने, बँका, सोसायट्या, भाजीपाला बाजार करोना संक्रमणाची ठिकाणं

अहमदनगर (प्रतिनिधी) –

ग्रामीण भागात गाव पातळीवर दूध संकलन केंद्र, किरणा दुकाने, विविध कार्यकारी सोसायट्या, बँका आणि भाजीपाला केंद्र ही करोना संक्रमणाची केंद्र असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि सरपंच-अधिकारी यांच्या संवादा दरम्यान समोर आले आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढणारी करोना संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांची चाचणी करणे, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करणे यास प्राधान्य द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.

- Advertisement -

वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी नगर, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी, अकोले आणि संगमनेर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी दिवसभरात दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष तथा पद्मश्री पोपटराव पवार हेही उपस्थित होते.

पहिल्या सत्रात नगर आणि नेवासा, त्यानंतर श्रीरामपूर आणि राहुरी आणि शेवटी अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हास्तरावरुन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह तालुकास्तरावरुन संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या, कोणत्या रुग्णवाढीचा वेग रोखण्यासाठीच्या उपाययोजना, ब्रेक दि चेन अंतर्गत करावयाची कार्यवाही, चेहर्‍यावर मास्क असणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या कोरोना रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधितांपासून संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण करुन बाधितांना तात्काळ उपचारांसाठी दाखल केले जाणे आवश्यक आहे. गावपातळीवरील अधिकार्‍यांवर त्यादृष्टीने सर्वाधीक जबाबदारी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

करोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. प्रत्येक गावात संक्रमण होणारी ठिकाणे लक्षात घेऊन तेथे प्रतिबंधात्मक नियमांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दूध संकलन केंद्रे, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे, विविध कार्यकारी सोसायटी, बँका याठिकाणी गर्दी होणार नाही हे पाहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासनाला सहकार्य म्हणजे गावाने गावकर्‍यांनाच सहकार्य करण्यासारखे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच सर्वांनी मिळून आता या करोनाचा सामना करायला हवा.

गटतट पाहण्याची ही वेळ नाही, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व सरपंचांना केले. हिवरेबाजार येथे करोना संसर्ग आटोक्यात आणण्यात तेथील ग्रामपंचायतीने यश मिळविले आहे. त्यामुळे तेथील अनुभव आणि कशापद्धतीने तेथे करोनाचा मुकाबला केला गेला त्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.

आज या ठिकाणी साधणार संवाद

कोपरगाव, राहाता, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील ग्रामस्तरीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशीही आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर संवाद साधणार आहेत.

नोंदणी करूनच लसीकरणाला या

सध्या जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी आणि त्यामुळे योग्य काळजी घेतली गेली नाही तर असणारा संसर्गाचा धोका सर्वांनी लक्षात घ्यावा. नोंदणी करून त्याप्रमाणे नियोजन करून लसीकरण करण्यात यावे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी जागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या