मुंबई
मुंबईतील आरे कारशेडबाबत फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय रद्द करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक दणका दिला आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचे घोषित करत, मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गमध्ये उभारण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे. मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. आता आरेमधील ८०० एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. तसेच मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथे उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं हा मुद्दा देखील प्रतिष्ठेचा बनवला होता. अखेर आता उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवून भाजपला एक प्रकारे शहच दिला आहे.
आरेमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले
दरम्यान, याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. जेव्हा आरे कारशेडसाठी झाडं तोडण्यात येत होती त्यावेळी काही पर्यावरणवाद्यांनी त्याला जोरदार विरोध केला होता. अनेकांनी तिथं जाऊन ही वृक्षतोड थांबविण्याचा करण्याचा प्रयत्न केला होता. तर काही जणांनी आंदोलन देखील केली होती. त्यावेळी भाजप सरकारने पर्यावरणवाद्यांवर आणि आंदोलकांवर गुन्हेही दाखल केले होते. हेच गुन्हे आता ठाकरे सरकारने मागे घेतले आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांही हा फार मोठा दिलासा मानला जात आहे.