चितळी |वार्ताहर| Chitali
अनेक वर्षानंतर डांबरीकरणाचे भाग्य लाभलेला येथील चितळी-खैरी निमगाव रस्त्याच्या कडेची बांधकामाची उर्वरित खडी उचलून साईड पट्ट्या मध्ये लवकरात लवकर मुरूम टाकावा व प्रवासी वर्गाची होणारी गैरसोय दूर करावी,अशी मागणी चितळी पंचक्रोशीसह प्रवासी वर्गातून होत आहे.
श्रीरामपूर शहराकडे जाण्यासाठी शेकडो प्रवासी चितळी-खैरी रस्त्याचा हमखास वापर करतात, साधारण चार किलोमीटर असणाजया या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. दोन-तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या नशीबी मजबूत डांबरीकरणाचा योग आला. आता रस्ता चकाचक होणार या आशाळभूत नजरेने प्रवासी वर्ग मनोमन आनंदी झाला. परंतु आर्थिक उपलब्ध निधीचे ग्रहण लागले आणि केवळ निम्मा रस्ताच फक्त डांबरीकरण झाल्याने प्रवासी वर्गाच्या व स्थानिक नागरिकांच्या आनंदावर लगेच विरजण पडले.
रस्त्याचे काम होऊनही दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला गेल्याने रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्या मध्ये मुरूम न टाकल्याने अनेक अडचणींचा सामना प्रवासी वर्गांना करावा लागत आहे. त्यात विशेषत: पादचारी व दुचाकी स्वरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही सामाजिक तरुणांनी संबधीत ठेकेदाराला संपर्क केला असता आज उद्या मुरूम टाकतो असे सांगितले जाते.
त्यात रस्त्याच्या कामाची सुरवातीची उर्वरित खडी ठिकठिकाणी अजून तशीच पडून आहे. वाहन ओव्हरटेक करताना व रहदारीसाठी त्याची मोठी अडचण होत असून, ती इतर साधने त्यावरून गेल्याने विखरून गेली असून, अर्ध्या रस्ता तयार होऊन ही या खडी मुळे व साईडपट्ट्या न भरल्याने प्रवासी वर्गांना डोकेदुखी ठरत आहे.
संबधित विभागाने या कामी लक्ष घालून लवकरात लवकर साईडपट्ट्या मध्ये मुरूम टाकावा,अशी मागणी प्रवासी वर्गातून व स्थानिक नागरीक करत आहे.
डांबरीकरणाची सुरवात जेथून झाली त्या आधी साधारण दोनशे मीटर रस्ता रेल्वे गेट पर्यंत अनेक ओव्हर लोडिंग साधनांमुळे तसेच मागील पाऊसाच्या पाण्यानी खराब झाला आहे. पॅच मारलेली खडी पुन्हा वर आली आहे.तिचे डांबरीकरण होणे गरजेचेआहे.अन्यथा पाऊस पडण्यास सुरवात झाल्यावर रस्ता जैसे थे होणार आहे.
– शैलेश वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष, चितळी