अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
बर्ड फ्लूच्या भितीने गैरसमज व अफवा पसरुन नागरिकांनी अंडी व कोंबड्याचे मास खाण्याचे बंद केल्याने कुक्कटपालन करणार्या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने सोमवारी चिकन मेजवाणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व सरकारचे करोना विषयक सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर हे या मेजवाणीत सहभागी होऊन कृतीतून चिकन व अंडी खाण्यास सुरक्षित असल्याचा संदेश दिला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.सुनिल तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी.एन. शेळके, पोल्ट्री असोसिएशनचे डॉ.देवीदास शेळके, विनय माचवे, रोहीदास गायकवाड, दत्ता सोनटक्के, संतोष कानडे, दीपक गोळख, डॉ.उमाकांत शिंदे, विठ्ठल जाधव, कैलास झरेकर, संदीप काळे, रविंद्र गायकवाड आदींसह पोल्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भोसले व करोना विषयक सल्लागार डॉ. म्हैसेकर यांनी राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसत असला तरी अंडी व कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नसल्याचे सांगून, चुकीच्या गोष्टी व अफवाला बळी न पडण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात अफवा व गैरसमज पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोंबडी व अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो.
याला कोणताही शास्त्रीय आधार नसून यापासून धोका नाही. करोनानंतर बर्ड फ्लूचे संकट आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरल्याने नागरिकांनी कोंबड्याचे मास व अंडी खाने बंद केले आहे.
यामुळे कुक्कटपालन करणार्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. नुकतेच पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. यामुळेच चिकनच्या मेजवाणीतून चिकन व अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित असल्याचा संदेश देण्यात आला आहे.