जळगाव jalgoan । प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली गावापासून 700 मीटर तर वॉकीनदीपात्रापासून (Wakindi) 200 मीटर अंतरावर असलेल्या तिरुपती अॅलम कंपनीकडून (Tirupati Alum Company) तुरटी तयार केली जात असून या तुरटीवर विविध रासायनिक प्रक्रियेचा वापर केल्यानंतर रसायनयुक्त पाणी (Chemical water) सरळ नदीपात्रात जात आहे. या नदीपात्र परिसरात गावाला पाणीपुरवठा (Water supply) करणार्या विहिरीतही दूषित पाण्याचा (Contaminated water) प्रवाह जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात (Endangering health) आली आहे.
या गावातील 20 ते चाळीस वयोगटातील तरुणांना पोटाचे विकार व मूतखड्याचे विकार होत असल्याच्या घटना समोर येत आहे. याप्रकरणी सागर घुगे, जितेंद्र घुगे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांच्याकडे तक्रर केली आहे.
जळगाव तालुक्यातील चिंचोलीगाव परिसरात तिरुपती अॅलम कंपनी असून या गावाला पाणीपुरवठा करणार्या वॉकीनदीपात्रापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या तिरुपती अॅलम कंपनीकडून त्रुटी तयार केली जात असून गेल्या 15ते 28 वर्षापासून उद्योग सुरु असून या उद्योगामधून रसायनयुक्त पाणी कायमस्वरुपी सर्रासपणे नदीतील पाण्यात सोडले जात असल्याने या संदर्भात गावातील नागरिक व शेतकर्यांकडून वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.
या उद्योगातून सोडलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील पाणी दूषित होत आहे. तसेच गावातील पाणीपुरवठा करणार्या दोन विहिरी ह्या नदीकाठी असल्यामुळे त्या व इतर विहिरींना सुद्धा ह्या दुषित पाण्याचा प्रसार होत आहे.
त्यामुळे मागील 5 वर्षापासुन लोकांना पोटाचे व मूतखड्याचे आजार उद्भवत आहेत. तसेच या गावातील गुरेढोरे यांच्यावर सुद्धा या दूषित पाण्याचा परिणाम होत आहे. तसेच या उद्योगातून रसायनयुक्तपाण्याचा वास कायमस्वरुपी येत असून त्यामुळे आजुबाजुच्या शेतकर्यांच्या शेतातील विहिरींनाही त्याचा प्रादुर्भाव होत असून शेतात काम करता येत नाही व त्यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत.
या कंपनीच्या आवाराला वालकंपाउंड सुद्धा नाही व तेथील रसायनयुक्तदूषित सांडपाण्यासाठी प्रोसेस प्लंट नसल्यामुळे ते रसायनयुक्तपाणी नदीतपात्रात थेट सोडण्यात येत आहे. या कंपनीच्या पाण्याची व नदीपात्र परिसरात सोडलेल्या पाण्याची चौकशी करुन पाण्याचे नमुने घेऊन ही कंपनी कायमस्वरुपी बंद करावी, अशी मागणी सागर घुगे, जितेंद्र घुगे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सागर घुगे यांनी या कंपनीच्या दूषित पाण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड ऑफीसर श्री.ठाकरे यांनी या कंपनीच्या पाण्याचे नमुने घेतले असून नाशिक येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
उपेंद्र कुलकर्णी, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून नागरिकांना दुषित पाण्यामुळे पोटाचे विकार वाढलेले आहे. त्यामुळे गावातील विहरींचा पाण्याचा नमुना तपाासणीसाठी पाठविला असता, त्यात 1800 ते 2000 च्या वर टीडीएस आलेला आहे. या परिसरात चिंचोली गावापासून तिरुपती अॅलम कंपनी एकमेव असल्याने या कंपनीच्या रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे.
सागर घुगे, तक्रारदार
दुषित पाण्यामुळे दोन विहिरींचा पाणीपुरवठा बंद
चिंचोली गावातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे विकार जडत असल्याने काही नागरिकांनी या परिसरातील विहिरींच्या पाण्याचे नमुने एका खासगी प्रयोग शाळेकडे तपासणी करण्यासाठी पाठविले होते. यात एका विहिरीचा टीडीएस 1800 तर दुसर्या विहिरीचा टीडीएस 2000 वर आलेला आहे. 500च्यावर टीडीएस असल्याने ते पाणी पिण्यास अयोग्य असते. यामुळे गावाला पाणीपुरवठा करणार्या नदीपात्रातील दोन विहिरी बंद करण्यात आलेल्या आहेत तर कमी टीडीएस असलेल्या दोन विहिरींवरुन गावाला पाणीपुरवठा सुरु आहे.