Friday, April 26, 2024
Homeनगरअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची फेरनियुक्ती करा

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची फेरनियुक्ती करा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

आ.नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी अ.भा.छावा संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

- Advertisement -

काल अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, उपजिल्हाध्यक्ष अविनाश सातपुते, सचिन खंडागळे आदी उपस्थित होते.

यावेळी अ.भा.छावाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे म्हणाले, कै.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने फक्त मराठा समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी या महामंडळाची स्थापना केली होती. सन 1998 पासून 2014 पर्यंत साधारण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे सर्वसामान्य मराठा मुलांना माहितीही नव्हते. सरकारने सन 2016 च्या नंतर कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष केले.

आपल्या वडिलांच्या नावाने असणार्‍या महामंडळाचा माझ्या सर्वसामान्य मराठा तरुणांना उद्योजक करण्यासाठी फायदा व्हावा, त्यांना आर्थिक निधी मिळावा, म्हणून आ. नरेंद्र पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आणि महामंडळाने पण कात टाकली होती. हजारोंच्या संख्येने मराठा तरुणांना बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा लाभ मिळाला. सन 2019 रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.

त्यांनीही आमदार नरेंद्र पाटील यांना अध्यक्ष म्हणून काम करण्यास संधी दिली. परंतु अचानक मराठा आरक्षणावर स्थगिती आली. नरेंद्र पाटील यांनी आपल्या राजकीय नफातोटा यांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता निःस्वार्थपणे मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी प्रखरपणे मांडायला सुरूवात केली. आंदोलन, विविध जिल्ह्यातील बैठकांना हजेरी लावली. याचा धसका काही राजकीय मराठा राज्यकर्त्यांनी घेतला व राजकीय कुरघुड्या करून कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे.

महामंडळामध्ये राजकारण आणून मराठा समाजातील युवकांचे नुकसान करू नये. पाटील यांना परत महामंडळाच्या अध्यक्षस्थानी सन्मानाने नियुक्त करावे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, नाहीतर मराठा समाज आणि सरकार यांच्यामध्ये संघर्ष हा निश्चित आहे. वेळीच सरकारने दखल न घेतल्यास भविष्यकाळात आखिल भारतीय छावा संघटना इतर समविचारी संघटनांना बरोबर घेऊन कुठलीही पूर्व कल्पना न देता तिव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी जिल्हा सचिव संभाजी निमसे, ज्ञानेश्वर टेकाळे, रमेश म्हसे, अविनाश क्षीरसागर, परिमल दवंगे, महेश चव्हाण, अनिल तळोले, सुहास निर्मळ, अक्षय झिने, कृष्णा गागरे, शुभम दांगट, गणेश बोबडे, कोळसे योगेश, राहुल चिंधे, मनोज शेटे, सोमनाथ चिंधे, अमोल मगर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या