श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यांवर ऊस वाहतूक ही बैलगाड्यांमधून होत आहे. मात्र अनेक बैलगाडीचालक अनधिकृतरित्या
बैलगाडी जुगाडाचा वापर करीत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील इतर वाहतुकीस मोठा अडथळा होत असून अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात वाढलेले आहेत. तरी या अनधिकृत वाहतूक करणार्या बैलगाड्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कार्यक्षेत्रात असणार्या सर्व साखर करखान्यांमार्फत ऊस वाहतुकीसाठी कारखाने परवाना नसलेले बैलगाडी जुगाड वापरतात तसे लिखित करार करून हा अवैध वाहतूक उद्योग चालतो. या बैलगाडी जुगाडमुळे रस्त्याने जाणार्या इतर साधनांना अडथळा निर्माण होतो आहे.
अनेक अपघात यामुळे होताहेत, त्यात हे ट्रॅक्टर चालक दोन तीन बैलगाडी जुगाड एकामागे एक जोडताहेत त्याना मान्यता प्राप्त जोडणी नाही आणि ते चालताना वाकडी तिकडी वळणे घेत डुलत -डुलत चालते. यामुळे समोरून येणार्या वाहनाला रस्ता सोडून लांब उभे राहून घ्यावे लागते अन्यथा हे अंगावर येऊन अपघात होऊ शकतो.
यासर्व अवैध ऊस वाहतुकीस आपली मूक संमती आहे असे दिसते कारण दि. 10 फेब्रुवारी 2020 रोजी निवेदन देऊन आपण कोणतीही कारवाई केली नाही पुन्हा आम्ही आपल्याला विनंती करतो की ही अवैध ऊस वाहतूक थांबून साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयास कोणतीही पूर्व सूचना न देता घेरावो घालण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, शहराध्यक्ष शरद बोंबले, शहर कार्याध्यक्ष गोरख शेजुळ, शहर उपाध्यक्ष मनोज होंड, जिल्हा सरचिटणीस प्रवीण देवकर आदींच्या सह्या आहेत.