चासनळी |वार्ताहर| Chasnali
दहा वर्षापूर्वी कोल्हे गटाच्या ताब्यात असलेली चासनळी सेवा सोसायटी अंतर्गत धुसफूसीमुळे काळे गटाच्या ताब्यात गेली. मात्र सात वर्षापासून त्यांना सत्तेचा उपभोग घेता आला नाही. सहकार मंत्र्यांपासून हायकोर्टापर्यंत बिगर कर्जदारांचा मुद्दा उपस्थित करीत दावे दाखल करत त्यांना सुखाने संसार करू दिला नाही. कोल्हेंकडून यासाठी रसदही पुरविण्यात आली. मात्र रसद पुरविणार्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे खटके उडाल्याने कार्यकर्त्याने निवडणुकीतून माघार घेतली. त्याचा परीणाम काळे गटाने 10 जागा आपल्याकडे ठेवून कोल्हे गटाला तीन जागा देवून निवडणूक बिनविरोध केली.
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील चास विविध कार्यकारी सोसायटी परिसराची कामधेनू म्हणून ओळखले जाते. दोन्ही बाजूंनी दोन वर्षापासून निवडणुकीची मोर्चेबांधणी चालू केली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूचे पॅनल तयार झाले. परंतु कोल्हे गटातील नेत्यांची पॅनल निवडीवरून अंतर्गत धुसफूस झाली. त्यांनी त्या प्रक्रियेतून माघार घेतल. तिथेच निवडणुकीचे वारे फिरले आणि सहमती एक्सप्रेस सुसाट धावू लागली.
अगोदरच अडचणीत असलेली संस्था निवडणुकीनंतर अजून अडचणीत येऊ नये यासाठी दोन्ही गटाकडून हा निर्णय घेण्यात आला. काळे गटाचे पारडे जड असूनही कोल्हे गटाला तीन जागा देण्यात आल्या. काळे गटाला दहा जागा देण्यात आल्या. निवडणूक मागील टप्प्यातच होणार होती मात्र औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली. स्थगिती उठल्यानंतर निवडणूक जाहीर करण्यात आली.
यामध्ये दोन्ही गटाचे लाखो रुपये पाण्यात गेले. वाद विकोपास जाऊ नये म्हणून दोन्ही गटाकडून हा निर्णय घेण्यात आला. या बिनविरोध निवडीसाठी माजी अध्यक्ष सुभाषराव गाडे, संचालक मनीष गाडे, भाऊसाहेब गाडे, विजय गाडे, चंद्रकांत चांदगुडे, कल्याणराव चांदगुडे, अशोकराव आहेर, राहुल चांदगुडे, अनिल गाडे यांनी प्रयत्न केले.