मुंबई | Mumbai
हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान आव्हाड याना आज (शनिवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आव्हाडांनी गंभीर आरोप केले.
पोलिसांनी आव्हाडांना न्यायालयात आणले तेव्हा नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “पोलिसांवर दबाब आणण्यासाठी चाणक्याकडून शंभर फोन येत होते,” असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे. हा चाणक्य कोण ? याची सध्या चर्चा सुरु आहे. “माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे,”असे आव्हाड म्हणाले.
सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिस आव्हाड यांना घेऊन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालय आव्हाड यांना जामीन देते की आव्हाडांना आजचा दिवसही कोठडीत घालावा लागतो, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमले आहेत.